*चैतन्य शक्ती (Life Force) – आतून बाहेर येणारी खरी उर्जा*
*✍️ रा.ग.सोनुने गुरुजी, मानसशास्त्र, तत्वज्ञान अभ्यासक, बुलढाणा*
सारा Life force आतून बाहेर येतो. आंतरिक प्रवाह आतून बाहेर येतो. जसा बी मधून अंकूर बाहेर येतो, जसा अंतर्मनातून आवाज बाहेर येतो, तशी मानवी सभ्यता मानवाच्या नाभीमधून बाहेर येऊन विकास पावते. अशा आतून बाहेर येणाऱ्या शक्तीवर जर बाहेरून दबाव आणला तर life force बाधित होतो.
*अंड्याचं उदाहरणच बघा -*
अंडे जेव्हा बाह्य शक्तीने फुटते, तेव्हा आतील life force नष्ट होतो. परंतु अंडे जेव्हा आतून फुटते तेव्हा एका जीवाचा जन्म होतो, life force चा उदय होतो.
जी गोष्ट जबरदस्तीने लादली जाते, ती गोष्ट विकास पावत नाही. जगातील सारी सभ्यता नैसर्गिकरित्या उदयास आली. परंतु बाह्य आक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. आता बाहेरून कितीही डागडुजी केली तरी सभ्यता ‘जैसी थी’ होणार नाही. त्या काळी हजारो कारागिरांनी अपार कष्ट करून स्थापत्य उभे केले. त्या वेळच्या कारागिरांची क्षमता, त्यांच्यातील life force आता कसा बरं निर्माण होणार?
बाह्य शत्रूने केवळ स्थापत्यच नष्ट केले नाही तर कारागिरांच्या भावना, कष्ट आणि त्यांचा life force नष्ट केला.
*विद्यार्थी आणि Life Force*
विद्यार्थ्यांमध्ये उर्जा असते, एक life force असतो. योग्य वातावरण न मिळाल्याने, परिस्थितीच्या दबावामुळे, संधी न मिळाल्याने त्यांच्या भावना, विचार कोमेजून जातात. एखाद्या विद्यार्थ्याला चित्रकलेची खूप आवड असते परंतु अयोग्य परिस्थितीमुळे त्याच्यातील life force नष्ट होतो.
बरेच विद्यार्थी माझ्याकडून भाषणे लिहून घेतात, ऐनवेळी विसरतात. भाषणातील शब्द आतून यायला हवेत. भलेही ते कमी असतील. भाषण वाचून दाखवणे किंवा पाठ करून सादर करणे म्हणजे आतील life force वर अन्याय करण्यासारखे आहे.
स्वामी विवेकानंद life force ला *’चैतन्य अवस्था’* म्हणतात. चैतन्य अवस्था प्रत्येकाच्या अंगी असते फक्त या अवस्थेचे प्रगटीकरण होणे महत्त्वाचे आहे.
*NEP २०२० आणि कल चाचणी*
National Education Policy-2020 च्या आराखड्यात कल चाचणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचा ज्या विषयात रस आहे, कल आहे अर्थात life force आहे त्या विषयात संधी देणे. विद्यार्थी जेव्हा आवडीच्या क्षेत्रात काम करतील, तेव्हा त्यांच्यातील विधायक शक्ती राष्ट्राच्या विकासाला कामी येईल, यात तीळमात्र शंका नाही.
—
*























