*अधिवेशनात महाराष्ट्रातील सामान्य जनतेला काहीही मिळाले नाही*
*हे केवळ भांडवलशाही आणि कंत्राटदारांच सरकार!*
– – *रा.काँ.शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे*
मुंबई
“आत्ताच्या अधिवेशनात केवळ घोषणा पोकळ होत्या. या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना उत्तर मिळाले नाही. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावात आम्ही महत्त्वाचे विषय मांडले. त्यामध्ये भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केले. मात्र सरकारकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही. अधिवेशनात जनतेला उत्तर अपेक्षित असते परंतु याठिकाणी फक्त राजकीय कुरघोड्यांचे आरोप प्रत्यारोप झाले.” असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की,”आत्ताच्या अधिवेशनात या महाराष्ट्रातील जनतेला काही मिळालं नाही. या अधिवेशनात फक्त आणि फक्त खोटी भाषणं ऐकली. अधिवेशनात जनतेला उत्तर अपेक्षित असते परंतु याठिकाणी फक्त राजकीय कुरघोड्यांचे आरोप प्रत्यारोप झाले. कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि त्याला सरकारचं पाठबळ आहे हे आम्ही पुराव्यानिशी दाखवल्यानंतर सुद्धा त्यावर एकही शब्द निघत नाही. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी एक वर्षापासून सापडत नसतील किंवा अशा प्रकारचे गुन्हे केलेल्यांना सरकार पाठीशी घालत असेल, सरकार आशीर्वाद देत असेल तर,ही गांभीर्याची बाब आहे. त्यामुळे ही सरकार फेल ठरलेल सरकार आहे.” असे शशिकांत शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, “सभागृहामध्ये आम्ही विरोधक म्हणून आक्रमकपणे आवाज उठवला. विशेषतः बरेच अधिकारी चुकीचे काम करत होते, त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. वेगवेगळ्या प्रकारची आयुधं घेऊन सरकारला घेरण्याचा आम्ही पुर्णपणे प्रयत्न केला. परंतु हे निर्ढावलेलं सरकार ट्रिपल इंजिन म्हणून किती पळतंय हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न करत असताना पुर्णपणे भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आणि ज्या योजना जाहीर केल्या त्या योजनेत फक्त व्यावसायिकता होती त्यामध्ये कुठेही पैशाचा, निधीचा तुटवडा लक्षात घेता या योजनेच्या माध्यमातून काय देणार एवढच सांगितलं आहे.’ असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले .


















