मुंबई दि. १२ एप्रिल – महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उत्तम समन्वयाने कार्य सुरू आहे मात्र सध्या माध्यमांमध्ये सूत्र नावाचे सूत्रधार आहेत अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावली आहे.
आज रायगड येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा आले असता माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा पसरविण्यात आल्या त्यावर माध्यमांशी बोलताना आनंद परांजपे यांनी याचे चोख उत्तर दिले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा हे
राजकीय कार्यक्रमासाठी न येता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगड येथे आले होते याची आठवण करून देतानाच जे माध्यमांमध्ये बोलले जात आहे अशाप्रकारे काहीही घडले नाही हे आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी होती त्यामुळे आज कुठलाही राजकीय कार्यक्रम रायगडावर नव्हता हे रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला येत असताना रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा न करण्याएवढी राजकीय परिपक्वता त्यांच्याकडे आहे असेही आनंद परांजपे म्हणाले. खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे अमित शहा यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण होते तसे मंत्री भरत गोगावले यांनादेखील होते हेही आनंद परांजपे यांनी आवर्जून स्पष्ट केले.
मंगेशकर कुटुंबियांचे संगीत क्षेत्रातील योगदान कुणीही विसरू शकत नाही. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात श्रीमती भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार डॉक्टरांवर कारवाई होईल. मात्र मंगेशकर कुटुंबावर टीका करणे क्लेशदायक आहे असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
















