*कोवळ्या जीवाची इतकी अवहेलना करणाऱ्यांना सोडले नाही पाहिजे. भर चौकात त्यांना फोडून काढले पाहिजे – रोहिणी खडसे*
जळगाव
सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील बालविवाह पीडित मुलीच्या आत्महत्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे. “आपला महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे ?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर व्यक्त होताना खडसे म्हणाल्या की, “मंगळवेढा तालुक्यातील बावची आणि निंबोणी परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आला होता. लग्नानंतर अल्पवयीन नवविवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिला मारहाणही केली. पती आणि सासरच्या लोकांकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडितेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोवळ्या जीवाची इतकी अवहेलना करणाऱ्यांना सोडले नाही पाहिजे. भर चौकात त्यांना फोडून काढले पाहिजे. हे प्रकरण वाटतंय तितकं सरळ नाही. यात बऱ्याच गोष्टी असतील ज्या लपवल्या जात आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे.” अशी मागणी खडसे यांनी केली आहे.



















