मुंबई, दि. २८ फेब्रुवारी.
भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार भरमसाठ आश्वासने देते पण त्यातील एकही पुर्ण करत नाही. निवडणुकीच्या तोंडावर घोषणाबाजी करुन जनतेची फसवणूक केली जाते आणि ते तर चुनावी जुमले होते असे सांगून जबाबदारी झटकतात. भाजपाच्या घोषणा म्हणजे ‘लबाडा घरचे जेवण’ अशी टीका करून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण करणार? असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी विचारला आहे.
भाजपा महायुती सरकारवर टीका करत सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१७ साली जलपुजन करण्यात आले त्याची एक वीटही अद्याप रचलेली नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदु मिलमधील स्मारक अद्याप पूर्ण झालेले नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नायक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली होती, त्याचाही अद्याप पत्ता नाही. मराठी भवन बांधण्याचे जाहीर केले होते ते अद्याप बांधलेले नाही. मराठी भाषा गौरव दिनी मराठीवर मोठी मोठी भाषणे देली जातात पण त्याचा विसर पडतो. सरकारने मराठी भाषा भवन तरी बांधावे.” असे राजहंस म्हणाले.

















