मुंबईत टाटा मेमोरियलसारख्या रुग्णालयांत कॅन्सरच्या उपचारासाठी बिहारमधून मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी या इमारतीत विशेष तरतूद करण्यात आली आहे.
दिल्लीतील बिहार भवनच्या धर्तीवर आता मुंबईतही एका भव्य ‘बिहार भवन’ बांधले जाणार आणि या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.
बिहार सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एलिफंट इस्टेट (मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसर) येथे या इमारतीचे बांधकाम केले जाईल. यामुळे मुंबईत उपचारासाठी किंवा कामासाठी येणाऱ्या बिहारमधील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये
प्रस्तावित बिहार भवन सुमारे ३० मजली असेल, ज्यामध्ये तळघर आणि आधुनिक सोयीसुविधांचा समावेश आहे. बिहार राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी ३१४ .२० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीला हिरवा कंदिल दाखवला आहे. हे भवन सुमारे ०.६७ एकर जमिनीवर बांधले जाईल आणि जमिनीपासून त्याची उंची साधारण ६९ मीटर असेल.
रुग्णांसाठी विशेष सोय
मुंबईत टाटा मेमोरियलसारख्या रुग्णालयांत कॅन्सरच्या उपचारासाठी बिहारमधून मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी या इमारतीत विशेष तरतूद करण्यात आली आहे.
रुग्ण निवास: इमारतीत एकूण १७८ खोल्या असतील.
डॉर्मिटरी: रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी २४० खाटांची भव्य डॉर्मिटरी विकसित केली जाईल.
वैद्यकीय कक्ष: इमारतीत स्वतंत्र वैद्यकीय कक्ष आणि इतर आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असतील.
आधुनिक सुविधा आणि पार्किंग
वाहनांच्या पार्किंगसाठी सेन्सर-आधारित ‘स्मार्ट ट्रिपल आणि डबल-डेकर’ पार्किंगची सोय असेल, जिथे एकाच वेळी २३३ वाहने उभी करता येतील. ७२ आसनी कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, सरकारी कामांसाठी स्वतंत्र दालने आणि बैठकीसाठी खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बिहार भवनचे मुंबईतील बांधकाम हे राज्याच्या प्रगतीच्या दिशेने आणि लोककल्याणासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे कुमार रवी यांनी म्हटले आहे.
***

















