राज्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे! – उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!
संविधान म्हणते मतदान करा अन् निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा; देवेंद्र फडणवीस अन् चोर कंपनी हरली म्हणत उद्धव ठाकरेंनी सगळंच
मतदानाच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार घडला. मुंबईत गुरुवारी सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला . त्यामुळे एकच खळबळ उडाली. यावरून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाभवनात पत्रकार परिषद घेऊन,निवडणूक आयोगावर व भाजपवर हल्लाबोल केला
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मतदान काही नवीन विषय नाही. आता असा प्रश्न विचारायला गेला पाहिजे शाई पुसली गेली का? भाजप आणि मित्र पक्षांनी अनेक प्रयत्न केलेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी बरेच घोटाळे केले.
यादीत बाईचा फोटो दाखवलाय. बाईचं नाव रविंद्र असेल का? भाजपच्या पाट्या मतदान केंद्रावर ठेवल्या जाताहेत. बोटावरची शाई पुसली जात आहे. निवडणूक आयोग आणि आयुक्त कसला पगार खात आहेत? ९ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. नवीन मतदार येतात, जातात, मात्र सुधारणा कसल्याही दिसत नाही.” असा हल्लाबोल त्यांनी निवडणूक आयोगावर केला.
*संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा.*
माध्यमातून बातम्या येत आहेत. मतदानाचा आणि मतमोजणीचा वेगवेगळा दिवस आहे. आता, प्रभाग क्रमांक २२६ चे पत्र बघा, टपाली मतदान जे झालं आहे, त्यात दुपारी ३ वाजता टपली मतदान स्ट्रांग रुममधून बाहेर काढण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात सूचना आहेत.
संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा. मुख्यमंत्री म्हणतात हा रडीचा डाव आहे. मग तुम्ही काय अधिकाऱ्यांना घर गडी नेमले आहात का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
इतकी खा-खा कशी काय सुटली आहे? महायुतीकडे कर्तृत्व नाही. गणेश नाईक यांच्या टांगा आहे की नाही? फिरुन फिरुन त्यांच्या टांगा दुखल्या. टांगा दुखल्या, घोडा फरार… निवडणूक आयुक्तांना निलंबित करायला पाहिजे. गणेश नाईक यांचे मतदान केंद्र फरार आहे. दुबार मतदारांची नावं पुढे येत आहेत. शाई पुसली जात नाही आहे तर लोकशाही पुसली जात आहे.” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
*देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चोर कंपनी हरली!*
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ” निवडणूक आयोग खात्रीपुर्वक कसे सांगू शकतात की, “शाई पुसली तरी, मतदान होणार नाही. किती हमीपत्र त्यांना मिळालेत? दरोडा घालण्याचा प्रयत्न केला जातोय तो आम्ही समोर आणतोय. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चोर कंपनी हरली आहे. हरलेल्या मानसिकतेमुळे त्यांना असले प्रकार करावे लागत आहेत. नाहीतर आम्ही जातोय तसे लोकांसमोर जाऊन दाखवा. निवडणूक आयोग हा संविधानविरोधी आहे. राज्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे.” अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली.
यावर फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं, तुच्छतेने म्हणाले, ‘हे काय दहशत निर्माण करणार, यांच्यात क्षमता तरी उरलीय का?”


















