सोनम वांगचूक देशद्रोही तर मग पाकिस्तानला जाऊन केक खाणारे मोदी कोण? …उद्धव ठाकरेंची टीका
मणिपूरच्या नावातील मणी यांना दिसला, पण त्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू कधीही दिसले नाहीत हे दुर्दैव !- उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली.
मुंबई :
शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता. पावसाचे वातावरण आणि सर्वत्र चिखल असूनही लाखो शिवसैनिकांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली.
शीवतीर्थावरील दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा… विजयादशमीच्या शुभेच्छा. अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच आयुष्यातील खरं सोनं असतं. अनेक पक्षांचं आपली शिवसेना फोडण्याकडे लक्ष असतं. त्यांना असं वाटलं काही जणांना त्यांनी पळवलं आहे… पण जे पळवलं ते पितळ होतं खरं सोनं माझ्याकडे आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आता घरुन येताना मी आजूबाजुला पाहत होतो… वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदाच पाहिलं. गाढवावर कितीही शाली टाका गाढव ते गाढवच… अमित शहांच्या जोड्याचा भार वाहणारे हे गाढव…
“भाजपने आपले कमळ फुलवण्यासाठी सगळीकडे चिखल करून ठेवला, त्यांनी कायद्यांचा दुरुपयोग करून अनेकांना तुरुंगात टाकले. देशभक्त असणारे सोनम वांगचूक एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोह ठरवण्यात आले. मग गुपचूपपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी कोण?” असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी, दादर येथील शिवाजी महाराज मैदानातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारला. मुंबईमध्ये खड्डे पडतात, ट्रॅफिकची समस्या आहे, पण हे भाजपचा महापौर होणार अशी बोंबाबोंग करत सुटले आहेत. आता हिंदू मुस्लिम वाद करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई यांनी जिंकली तर अदानीच्या घशात घालतील असं म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले.
“उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. जिथे मराठीची गळचेपी होणार, मातृभाषेचा विषय येईल त्या ठिकाणी आम्ही सगळं विसरून एकत्र येणार. भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली नव्हती, ती आम्ही मिळवली. आता ही मुंबई कुठल्या व्यापाऱ्याच्या घशात जाणार असेल तर कुणालाही सोडणार नाही.
हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो आम्ही समोर आणू. भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवावे.”असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदुत्वाच्या नावावर हे माणसं मारतात, बोगस गोरक्षकांच्याकडून हे कृत्य होतंय. त्याचवेळी आसाममध्ये भाजपचा मुख्यमंत्री असताना तिकडे गोमांस खाता येतं. मग नेमकं काय ते धोरण ठरवा आणि मग आमच्या समोर या .”असे आव्हान देत उद्धव ठाकरे म्हणाले.
सगळीकडे चिखल झाला आहे, त्याचं कारण हे कमळाबाई. कमळाबाईने स्वतःची फुले फुलवली, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल केला. पण आता आपली जबाबदारी आहे. काही जणांच्या आयुष्यात फुल नाही तर फुलाची पाकळी जरी उमलवू शकलो तरी खूप झालं.
या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा म्हणाले होते. आज म्हणतात की, ‘ओला दुष्काळ’ असा काही प्रकारच नाही. कोणतेही निकष न लावता सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर करावे. आपलं सरकार असताना कर्ज माफी केली होती.
संघाचा जो दसरा मेळावा झाला त्यावर बोलणार आहे. संघाला १०० वर्षे झाले आणि नेमकी आज गांधी जयंती आहे, हा काही योगायोग म्हणायचे की काय माहिती नाही.
जो लढेल तो तुरुंगात जाईल अशी परिस्थिती आहे. राज्यात जनसुरक्षा कायदा लागू केला, त्याला सर्वांनीच विरोध केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही कारण सांगितलं. पण सोनम वांगचूक हे देशभक्त, त्यांनी लेह लडाखसारख्या दुर्गम भागात अनेक कामं केली. थंडीत काम करणाऱ्या जवानांसाठी त्यांनी सोलार छावण्या बांधून दिल्या. पाण्याची कमतरता होती त्या ठिकाणी आईस स्तूपच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले.
सोनम वांगचूक यांनी लडाखच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केला. पण मोदींनी त्यांच्यावर रासुका लावला. त्यामुळे अशा कायद्यांचा दुरुपयोग केला जातो. मोदींची स्तुती करेपर्यंत ते देशभक्त होते, आता देशद्रोही कसे झाले. एका परिषदेला पाकिस्तानमध्ये गेले म्हणून सोनम वांगचूक हे देशद्रोही ठरले. मग गुपचूप पाकिस्तानला जाऊन केक खाणारे मोदी कोण? ” असा
प्रश्न उपस्थित करुन उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, “तीन वर्षे मणिपूर जळत होते, पण आत्ता मोदी मणिपूरला गेले. त्या नावातील ‘मणी’ यांना दिसला, पण त्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत.”
“एका बाजूला हे मुस्लिमांना शिव्या देणार, त्यांना देशद्रोही म्हणणार आणि त्याचवेळी आरएसएसचे मोहन भागवत हे दिल्लीमध्ये मुस्लिम मौलवींची भेट घेणार, ही अशी यांची नीती आहे. पहलगाममध्ये धर्म विचारून पाकिस्तानने आपल्या नागरिकांना ठार केलं. त्याच पाकिस्तानसोबत हे क्रिकेट खेळतात?”
“राज्यातील शेतकरी हताश झालाय, तो लढतोय. पण देवेंद्र फडणवीसांचा अजून अभ्यास सुरू आहे. तिकडे पंतप्रधान काहीही मदत करत नाहीत. बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर १०-१० हजार रुपये टाकले. पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही. यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत.
मोदींना प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव करायचा आहे. जीएसटी कुणी लावला होता, नेहरुंनी लावला होता का? आठ वर्षे यांनी लोकांना लुटलं, आता महोत्सव साजरा करत आहेत.
भाजपच्या औलादी हे पगारी मतदार उभे करत आहेत. आपल्याला पगारी मतदार व्हायचं की स्वाभिमानी मतदार व्हायचं ते प्रत्येकाने ठरवावे.
भाजपचा कोणत्याही कामामध्ये संबंध नाही, पण त्याचं श्रेय यांनी घेतलं. बीडीडी चाळीच्या कामाचा शुभारंभ मी केला होता, जितेंद्र आव्हाडांनी त्यासाठी मेहनत घेतली होती. आता भाजपवाले म्हणतात की , ‘त्यांनीच बीडीडी चाळ उभी केली.’
मुंबईतील नाईटलाईफवर हे बोलत होते, पण आता त्यांनीच हा निर्णय घेतला. मकाऊमध्ये जाऊन नाईट लाईफ जगणारे आमच्यावर टीका करत होते.


















