Home नागपूर *उद्धव ठाकरेंचा डाव यशस्वी होणार??? अनेकांची घरवापसी? नागपुरात पडद्यामागे हालचाली सुरू!*

*उद्धव ठाकरेंचा डाव यशस्वी होणार??? अनेकांची घरवापसी? नागपुरात पडद्यामागे हालचाली सुरू!*

96
0

Shiv Sena UBT :* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी नागपूर शहरात नव्याने पक्षबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना मुंबई ऐवजी नागपूरलाच प्राधान्य दिले जात आहे. संपर्क प्रमुख म्हणून सतीश हरडे यांची नियुक्ती करून नव्या बदल्याचे संकेत पक्षाने दिले आहे. सोबतच जे नाराज होऊन पक्षबाहेर पडले त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. यात माजी नगरसेवक, जिल्हा प्रमुखांसह एकनाथ शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये गेलेल्यांचा समावेश आहे.

महापालिकेत भाजपसारख्या बलाढ्य पक्षाविरोधात लढायचे असल्याने काही अनुभवी पदाधिकारी, नगरसेवकांच्या खांद्यावर भगवा टाकून त्यांच्या हाती मशाल दिली जाणार आहे. शहराचे माजी उपमहापौर, जिल्हा प्रमुख राहिलेले आणि विधानसभा निवडणूक लढण्याचा दांडगा अनुभव असलेल्या एका नेत्याचाही यात समावेश आहे. ही बोलणी स्थानिक पातळीवर सुरू असली तरी पक्षात येणाऱ्या संभाव्य कार्यकर्त्यांची नावे उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली असल्याचे समजते.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने आजपर्यंत संपर्क प्रमुख मुंबईवरून पाठवला जायचा. तो चार-दोन पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहायचा. स्थानिक राजकारणाशी संबंध नसल्याने एकतर्फी निर्णय होत होते. माजी मंत्री तानाजी सावंत यापूर्वी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी एकदा आले. त्यानंतर ते फिरकलेच नाहीत. त्यांच्या जागी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांची नागपूरचे संपर्क प्रमुख नियुक्ती केली होती. काल पक्षात आले आणि संपर्क प्रमुख केल्याने अनेक निष्ठावंत दुखावले होते.

अनेकांनी शिवसेनेसोबत संपर्क तोडला होता. काही अज्ञातवासात गेले होते. पूर्वी जिल्हा प्रमुख राहिलेले शेखर सावरबांधे, सतीश हरडे यांचे चतुर्वेदी यांनी पक्षात डिमोशन केले होते. हरडे यांनी तत्काळ पदाचा राजीनामा दिला होता. सावरबांधे यांनी पक्षच सोडून दिला होता. महाविकास आघाडीचे सरकार जाताच दुष्यंत चतुर्वेदीही उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला एकनाथ शिंदेंच्या गोटात दाखल झाले. त्यामुळे संपर्क प्रमुख मुंबईचा करायचा की स्थानिक यावर मतभेद निर्माण झालेले.

उद्धव ठाकरे यांनी यात हस्तक्षेप केला. निष्ठावंत सतीश हरडे यांनी गोंदिया-भंडाराचे संपर्क प्रमुख, सह संघटक  हरडे यांच्यावर नागपूर शहराची सूत्रे सोपवली. त्यामुळे निष्ठावंत सुखावले आहेत. अनेकांनी पुन्हा शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. लोकाधिकार समितीचे प्रमुख अमित रानडे यांनी पंधरा वर्षांच्या अज्ञातवासानंतर सक्रिय होण्याचे आश्वासन दिले आहे.

मागील महापालिकेच्या निवडणुकीत सात ते आठ हजार मते घेणाऱ्या उमेदवारांनी पुन्हा हरडे यांच्याशी संपर्क साधला आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या काळात झालेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली जातेय . उद्धव ठाकरे यांनीही ज्यांना काम करायची इच्छा नाही, फक्त पद मिरवायचे आहे, त्यांनी स्वतः पदांचा राजीनामा द्यावा, अशी सूचना केली असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here