मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत पुनर्वसन प्रकल्पांमध्ये होत असलेल्या गंभीर गैरप्रकारांना वाचा फोडत भारतीय जनता पक्षाच्या झोपडपट्टी मोर्चाने शासन दरबारी आवाज उठवला आहे. झोपडपट्टी मोर्चा, भाजपा मुंबईचे अध्यक्ष श्री. आर. डी. यादव व महामंत्री श्री. योगेश सुभाष खेमकर यांनी २० जून २०२३ रोजी मुख्यमंत्री, राज्यपाल व अप्पर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांना पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती.
दि. ५ जून २०२३ रोजी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रियेमधील त्रुटी, विलंब व गैरप्रकारांबाबतची माहिती अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही, असे उघड झाले. यासंदर्भात भाजपा झोपडपट्टी मोर्चाने १९ ऑक्टोबर व ७ डिसेंबर २०२३ रोजी निवेदने दिली होती, तसेच दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
यावर पुढील कारवाई म्हणून, शासनाच्या दिनांक १८ जानेवारी २०१३ रोजीच्या परिपत्रक क्र. संकीर्ण 2013/प्र.क्र 8/18 नुसार, अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना त्यांच्या पूर्वीच्या विभागात परत पाठवण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांनी दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी “SRA कडून कारवाईचा अहवाल मिळवा” असे स्पष्ट निर्देश दिले असूनही अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीस विलंब केला जात आहे, हे विशेष नमूद करावे लागेल.
भाजप झोपडपट्टी मोर्चाने पुनर्वसन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित व्हावा, तसेच प्रशासनातील हलगर्जी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे यासाठी लढा सुरू ठेवण्याचे ठाम मत व्यक्त केले आहे.



















