उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी घातपाताचा गंभीर आरोप केला आहे. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप करत, त्यांनी या प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली. ब्लॅक बॉक्स आणि इंधनाच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पारदर्शक तपासाची गरज रोहित पवारांनी बुधवारी पुन्हा अधोरेखित केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान बारामतीजवळ कोसळले आणि २८ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. अजित दादांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला, कोणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी २९ जानेवारीला बारामती येथे अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. मात्र या घटनेनंतर काही दिवसांनी या अपघाताबद्दल विविध शंका उपस्थित होऊ लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी तर हा अपघात नसून घातपात असल्याच थेट आरोप केला. त्याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन, पुरावेही सादर केले. एवढेच नाही तर या घटनेच्या तपासासाठी त्यांनी खाजगी गुप्तहेर संस्थांची मदत घेतल्याचे माहितीही समोर आले.
मात्र सरकारकडून या घटनेचा नीट तपास होतोय का यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. बुधवारी मुंबईतील वाय बी. चव्हाण सभागृहात रोहित पवार यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत या अपघाताशी संबंधित अनेक शक्यतांबाबत गौप्यस्फोट केले.
*कंपनीला वाचवले जातेय*
तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे, पण त्याचा वेग कमी आहे असे आ. रोहित म्हणाले. ब्लॅक बॉक्स, फ्युएल टँक याबददलही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. तसेच सत्तेतील लोकांकडे बोट दाखवत
व्हिएसआर कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक मुद्दाम मालकाला वाचवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. दादा गेले त्याचं काही नाही. पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून या कंपनीला मदत केली जात आहे. या कंपनीवर आज ना उद्या बंदी घातली पाहिजे असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
*व्हीएसारला पाठबळ दिले जातेय!*
या संपुर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे. सीबीआयला चौकशी दिली, सीआयडी घेतलीच आहे, ते ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. डीजीसीए आहे, त्यांची इंटर्नल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे, हरकत नाही. पण भारताच्या बाहेरच्या २ एजन्सी घेतल्या पाहिजेत आणि त्या सर्व एजन्सीना रिपोर्ट करण्यासाठी एक मॉनिटरिंग एजन्सी असावी. रिपोर्टिंगसाठी एक कमिटी फॉर्म करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
दुर्देवाने महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नाही. देशातील विरोधी पक्षाचा नेता घ्या. माजी अधिकारी, माजी जजेस तुम्ही घ्या. काही चांगले तज्ज्ञ घ्या, या कमिटीला रिपोर्ट सादर केला पाहिजे. कमिटीच्या मनात जे प्रश्न आहेत, ते एजन्सीला विचारण्याची संधी दिली गेली पाहिजे. पारदर्शक तपास व्हावा अशी मागणी आहे, मात्र आज ते होताना दिसत नाही. व्हीएसारला पाठबळ दिले जातेय असाही आरोप त्यांनी केला.
धमक असेल तर कंपनीला कुलूप लावून दाखवा
जर खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना, त्या सत्तेचा वापर करून व्हीएसआरला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक दाखवा असं थेट आव्हान रोहित पवार यांनी दिले.
आज अजित दादा असते आणि आज त्यांच्या कुटु्ंबात, राष्ट्रवादी परिवारात जर अशी घटना घडली असती तर दादा थेट म्हणाले असते की , ‘राजकारण बाजूला, आत्ताच्या आत्ता व्हीएसआर बंद करा.’ ही दादांची धमक होती.
ही धमक मात्र आज सत्तेत असलेल्या लोकांकडून दिसावी अशी लोकांची आणि आमची अपेक्षा आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

















