*विधीमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव*
*”देशाच्या प्रतिष्ठेसाठी एकत्र या”; सरन्यायाधीश यांचे आवाहन*
मुंबई, दि. ८ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहात आज भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताच्या ओळी गाऊन उपस्थितांचे मन जिंकले.
आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “राजकीय आणि सामाजिक मतभेद असू शकतात, पण देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे.” त्यांनी सहिष्णुता, समन्वय आणि संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत लोकशाही प्रक्रियेतील एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले.
या विशेष कार्यक्रमावेळी विधीमंडळातील दोन्ही सभागृहांचे मान्यवर नेते उपस्थित होते. विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आभार मानले.
राज्याच्या राजकीय आणि न्यायपालिका क्षेत्रातील या ऐतिहासिक प्रसंगाने विधीमंडळाच्या वातावरणात एक वेगळीच प्रतिष्ठा निर्माण केली.






















