नाशिकात ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानाअंतर्गत ‘ गोदा महोत्सव’२०२४
गोदा महोत्सव २०२४ चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद नाशिक तर्फे करण्यात आले आयोजित गोदा महोत्सव२०२४ अंतर्गत ‘ बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमामध्ये पुस्तक प्रकाशन पुरस्कार वितरण कवी संमेलन कार्यक्रमांचे महिलांसाठी आयोजन करण्यात आले.
नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांचा ‘ गोदा कन्या पुरस्कार’ तसेच गुणवंत अंगणवाडी आशा सेविका ,सरपंच, गुणवंत शिक्षक तर लिंग गुणोत्तरसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती आदींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .
माध्यमक्षेत्रासाठी नाशिक येथील ‘ विश्वास रेडिओ’ या समाजामध्ये जनजागृतीसाठी प्रसार माध्यमाचा उपयोग करणाऱ्या तसेच करोना काळात आदिवासी वाड्यापाड्यांवरील मुलांच्या शिक्षणासाठी प्रसारमाध्यमाचा प्रभावीपणे उपयोग करणारा ‘ये विश्वास’ या कम्युनिटी रेडिओ च्या संचालिका ‘रुचिता ठाकूर ‘ यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक राजस्थानातील जयपूर येथील डॉक्टर श्रेया अग्रवाल , प्रसिद्ध लेखक शिवाजी खैरे, स्वतः अल्पशिक्षित असूनही वाचन चळवळीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘भिमाबाई जोंधळे’ ,जि. प. च्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेर आदी मान्यवर उपस्थित होते .
बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमात दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात ५७ निर्णय क्षम महिलांचा सहभाग आणि ‘महिला प्रगतीसाठी संस्थात्मक यंत्रणा ‘ असे दोन परिसंवादही आयोजित करण्यात आले होते
मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या दहा महिलांचे कार्य नमूद करणाऱ्या ‘गोदा कन्या महिला विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित महिलांशी संवाद साधताना जि प मुख्याधिकारी असीमा मित्तल म्हणाल्या की ,”घराबरोबर घराबाहेरही महिलांचे कार्य कधी संपत नाही .समाजासाठी महिलांचे काम मोठे आहे मात्र, दुर्दैवाने जीडीपी मध्ये या कामाचे मूल्य दिसून येत नाही.
महिलांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन करताना जयपूर येथील आरोग्य तज्ञ डॉक्टर श्रेया अग्रवाल म्हणाल्या की घरातील स्त्री सुशिक्षित आणि निरोगी असेल तर आपोआप कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. त्यासाठी मुलींना शिक्षण आवश्यक आहे .आज आपण निसर्गापासून दूर गेल्यामुळे विविध आजार निर्माण होत आहेत त्यामुळे आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाने अवलंबिली पाहिजे.
कार्यक्रमाचा प्रारंभ महिलांच्या ग्रंथदिंडीने झाला कार्यक्रमाला जिल्हा परिषद ग्रामपंचायत व समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



















