राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षह शरद पवार
परभणी
परभणी व बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या घटनांबद्दल तातडीने कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
शरद पवार यांनी आज बीडमधील मस्साजोग गावचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. त्यानंतर ते परभणी इथं येत पोलिस कोठडीत असताना मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शरद पवार यांच्याबरोबर यावेळी पक्षाचे सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकारी होते. शरद पवार साहेब यांच्या या दोन्ही दौऱ्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, या दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते. या घटनांवर राज्य सरकारला वस्तूस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही चर्चा करू. या घटनांमुळे महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली असून या संदर्भात गंभीर विचारमंथन व तातडीने उपाययोजना करने आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शरद पवार साहेब यांनी या घटनांबद्दल राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
या घटनांमुळे समाजात भीती व असुरक्षितता निर्माण होत आहे, जी थांबवणं गरजेचं आहे असेही शरद पवार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे ,फौजिया खान, माजी आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




















