नागपूर
कोदवली गाव, जिल्हा रत्नागिरी येथील राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या कामाला शासनाने यापूर्वी मंजुरी दिली होती. त्यावेळी शासनाने १० कोटी रुपये या जलसंधारण प्रकल्पासाठी मंजूर केले होते. तथापि हा प्रकल्प ७० टक्के पूर्ण झाला. त्यामुळे या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मंजुरी देणे व अतिरिक्त रक्कम मंजूर करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित होता. यावर विधानपरिषद सदस्य भाई जगताप यांनी विनंती अर्ज समितीकडे विधान परिषदेमार्फत सादर केला. यावरती विनंती अर्ज समितीच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदर अर्ज समितीच्या समोर चर्चेसाठी ठेवला.
याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाकडून याबाबतचा सविस्तर अहवाल मागणी केला. यानंतर जलसंधारण विभागाच्या सचिवांची साक्ष लावण्यात आली होती. त्या साक्षीच्या वेळेस सचिवांनी शासनाच्या नवीन प्रशासकीय मंजुरी बरोबर उर्वरित आवश्यक असणारा खर्च ८ कोटी १८ लाख शासनाने मंजूर केल्याबाबत शासकीय निर्णय सादर केला. हा विनंती अर्ज समितीने घेतलेल्या विधान परिषद सदस्याच्या अर्जांची दखल घेत कोदवली गाव, तालुका राजापूर येथील धरणाला आवश्यक असणाऱ्या रकमेबाबत शासनाने उर्वरित ८ कोटी १८ लाख मंजूर केले.
याबाबत कोदवली गावच्या लोकांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिनंदन करून आभार मानले, या समितीमुळे हा विषय मार्गी लागला. याबाबत आज दिनांक २०डिसेंबर २०२४ रोजी विनंती अर्ज समितीचा अहवाल विधान परिषदेमध्ये सादर करण्यात आला या अहवालाला विधान परिषदेने मंजुरी दिली.



















