कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी किडींच्या प्रादुर्भावाचा व बोंडअळीचा आढावा घेत विविध उपाययोजना तातडीने राबवण्याचे दिले निर्देश
मुंबई
राज्यात बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांवर व विशेष करून सोयाबीन व कापसावर बोंड आळी व अन्य किडींचा प्रादुर्भाव असल्याच्या काही घटना उघड झाले असून याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत आज तातडीने विभागाची बैठक घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले सोलार लाईट ट्रॅप बाधित शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. हे लाईट ट्रॅप बोंड आळीचे व अन्य किडींचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. तसेच फेरामाईन ट्रॅप व कृषी विद्यापीठाने सुचवलेल्या वेगवेगळ्या फवारण्या आदी बाबत शेतकऱ्यांना जागृती व उपलब्धता करून देण्याचे निर्देश दिले.
याबाबत आयुक्त स्तरावरून व कृषी विद्यापीठाचे तज्ञ यांची एक संयुक्त टीम करून दैनंदिन आढावा घेण्याचे तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, त्याचबरोबर चारही कृषी विद्यापीठातील या विषयाचे तज्ञ यांसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.



















