कोल्हापूर, दि. २० जून २०२६ : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशिलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) उपस्थित होते.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिराचे प्राचीन वैभव जपत भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा राबविण्यात येत आहे. मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा तसेच वारसा संवर्धनाच्या विविध कामांचा या प्रकल्पात समावेश आहे. कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार असून राज्याच्या विकासातही त्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार निरंजन डावखरे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















