*पद्मश्री कवी नारायण सुर्वे हे श्रमाची स्फूर्ती देणारे कवी – ॲड आशिष शेलार*
मुंबई,
महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लाभलेल्या पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या कविता, लेख आणि गीतांवर आधारित ‘मास्तरांची सावली’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. समाजातील श्रमिक, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाला आपल्या कवितांमधून शब्दबद्ध करणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या साहित्यविश्वाचा संवेदनशील आणि कलात्मक आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता आली.
पद्मश्री कवी नारायण सुर्वे हे मराठी साहित्यविश्वातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि लोकाभिमुख कवी म्हणून ओळखले जातात. श्रमिक, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाच्या जीवनसंघर्षाला त्यांनी आपल्या कवितांमधून प्रभावी शब्दरूप दिले. मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनाशी निगडित वास्तव, सामाजिक विषमता, मानवी वेदना आणि संघर्ष यांचे सशक्त चित्रण त्यांच्या कवितांमध्ये आढळते. साध्या, सरळ आणि प्रभावी भाषाशैलीत त्यांनी मराठी कवितेला नवे सामाजिक भान आणि वास्तवदर्शी दृष्टिकोन दिला. ‘ऐक मास्तर’, ‘जाईन मी जिथे नेईल तिथे’ यांसारख्या त्यांच्या रचनांनी मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान निर्माण केले असून, त्यांचे साहित्य आजही नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरते. त्यांच्या या साहित्यिक योगदानामुळे ते मराठी काव्यपरंपरेतील एक लोकाभिमुख आणि युगप्रवर्तक कवी म्हणून ओळखले जातात.श्रमाला स्फुर्ती देणारे कवी म्हणून ओळख निर्माण करणारे पद्मश्री कवी नारायण सुर्वे हे होते असे प्रतिपादन ॲड. आशिष शेलार माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यांनी केले.
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा येथे रंगला.
साहित्य, कविता, संगीत आणि नाट्य अभिव्यक्तीचा संगम साधणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक विशेष सांस्कृतिक पर्वणी ठरला.
सदर कार्यक्रम ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात मराठी रंगभूमी, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार सहभागी झाले. अभिनेते तथा कवी किशोर कदम आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत नारायण सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण केले असून ज्येष्ठ साहित्यिक मुकुंद कुळे हे सुर्वे यांच्या साहित्याचा आशय आणि सामाजिक संदर्भ उलगडून सांगितला. अभिनेत्री नंदिता पाटकर, हर्षल पाटील आणि अक्षय शिंपी हे कलाकार कविता, लेख आणि गीतांच्या सादरीकरणातून कार्यक्रमाला अधिक गोडी निर्माण केली.
नारायण सुर्वे यांच्या कवितांमध्ये श्रमिकांचे जीवन, सामाजिक विषमता, संघर्ष, मानवी नाती आणि वास्तववादी विचारांचा प्रभावी आविष्कार पाहायला मिळतो. त्यांच्या कवितांनी मराठी साहित्यात लोकाभिमुख आणि वास्तववादी काव्यपरंपरेला नवे परिमाण दिले. ‘मास्तरांची सावली’ या कार्यक्रमातून त्यांच्या साहित्यिक प्रवासाचे आणि सामाजिक बांधिलकीचे विविध पैलू कलात्मक माध्यमातून उलगडले गेले आहेत.
साहित्य, कला आणि संस्कृतीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.

















