*बालस्नेहालयातील चार गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री शिंदे खंबीरपणे उभे!*
ठाणे: आयुष्याच्या वाटेवर आई-वडिलांचे छत्र हरवलेले असताना, केवळ जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांच्या संघर्षाची गाथा संपूर्ण राज्यासमोर आली आहे. बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाची बातमी वाचून,अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे.
यातील दोन विद्यार्थ्यांना विज्ञान (सायन्स) शाखेत प्रवेश घेऊन पुढे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, तर एका विद्यार्थ्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि एकाला हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात आपले करिअर घडवायचे आहे. या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांना त्यांच्या आवडीच्या शाखांमध्ये शिक्षण मिळावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश तातडीने ‘आनंद विश्वगुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयात’ निश्चित करण्यात यावेत, असे आदेश त्यांनी संस्थेचे सचिव डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांना दिले आहेत.
ठाणे पालिका आणि रेनबो फाउंडेशन संचालित बालस्नेहालयातील साहिलकुमार शहा, गिरीश शार्दूल, विशाल शर्मा आणि गीतेश भोईर या मुलांनी ५५ ते ७२ टक्क्यांपर्यंत मजल मारून प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी केवळ प्रवेशाचे आदेशच दिले नाहीत, तर या मुलांच्या उच्च ध्येयांना गवसणी घालण्यासाठी लागणारा खंबीर आधार देण्याचेही आश्वासन दिले आहे. या मदतीमुळे या चारही विद्यार्थ्यांच्या पुढील प्रगतीचा आणि स्वप्नपूर्तीचा मार्ग आता खऱ्या अर्थाने प्रशस्त झाला आहे.


















