*१०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र राज्य हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’*
*-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार*
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिन निमित्ताने हुतात्मा स्मारक येथे शनिवार दि. १ मे २०२६ सकाळी ठिक ०७.१५ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
१०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचा ‘ग्रोथ इंजिन’ असल्याची भावना मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केली.
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलिस महासंचालक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि इतर मान्यवर यांनीही याप्रसंगी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतातील ओळींचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून दिली. महाराष्ट्र दिन हा प्रत्येकासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
कामगार दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा उल्लेख करत “पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही, तर कामगाराच्या तळहातावर असते,” असे सांगून कामगारांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्र राज्याच्या तसेच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्या श्रमांमुळेच संपन्नतेची उभारणी झाली आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
—




















