Home मुंबई *‘खाकी’च्या बळावर विकासाला गती,महाराष्ट्र पोलीसांना ‘ग्लोबल’ बनवण्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार!*

*‘खाकी’च्या बळावर विकासाला गती,महाराष्ट्र पोलीसांना ‘ग्लोबल’ बनवण्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार!*

13
0

*मजबूत कायदा-सुव्यवस्था हीच प्रगतीची गुरुकिल्ली!*

*३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन*

मुंबई,
राज्यातील पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मजबूत कायदा-सुव्यवस्था हीच राज्याच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली असल्याचेही त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.

३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हा स्पष्ट संदेश दिला. सशस्त्र पोलीस मुख्यालय, कलीना (सांताक्रूझ पूर्व) येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “सरकार हे केवळ आदेश देणारे नसून पाठीशी उभे राहणारे आहे.” पोलिसांसाठी दर्जेदार घरे, सुसज्ज पोलीस स्टेशन, आधुनिक शस्त्रे, वाहने आणि सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आपण पोलिसांना नेहमी खाकी वर्दीत पाहतो, मात्र आज ते क्रीडावेशात मैदानात उतरलेले पाहणे अभिमानास्पद आहे. या क्रीडा स्पर्धा म्हणजे महाराष्ट्राचे ‘महा ऑलिम्पिक’ असून, महाराष्ट्र पोलीस ‘खिलाडी नंबर वन’ असल्याचे जगाला दाखवण्याची ही मोठी संधी आहे.”

“स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू विजेता आहे.” असे सांगत त्यांनी खेळाडूंना प्रेरित केले. यावेळी त्यांनी प्रभावी शब्दांत म्हटले, “हे खेळाचे मैदान आहे; येथे पंच आहेत, पण पंचनामा नाही इथे नोंद होईल ती विक्रमांची!” या विधानाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्र पोलीस खेळाडू राज्यापुरते मर्यादित नसून देशपातळीवर आणि जागतिक पोलीस स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी करत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी भविष्यात ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्येही पोलीस खेळाडूंना संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पोलीस दलाच्या ताणतणावपूर्ण कामाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, सण-उत्सव, मोर्चे, कायदा-सुव्यवस्था राखताना पोलिसांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हा मंत्र जपत ते जनतेचे संरक्षण करतात. अशा परिस्थितीत क्रीडा स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि पोलीस दलात मैत्रीभाव वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

राज्य सरकार पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे अधोरेखित करत शिंदे म्हणाले,
मुंबई हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, मजबूत कायदा-सुव्यवस्था हीच विकासाची खरी गुरुकिल्ली आहे. गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढले असून, सुमारे ९० टक्के प्रकरणे ६० दिवसांत निकाली काढली जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कालीना येथील सुसज्ज मैदान, पोलीस कॉलनी आणि उत्कृष्ट सुविधा यांचे कौतुक करत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच पोलीस केवळ कर्तव्यदक्ष अधिकारी नसून क्रीडा, पोलीस बँड, संगीत, लेखन आणि कला क्षेत्रातही पुढे असल्याचे सांगत त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.

शेवटी, पोलिसांच्या त्याग आणि सेवाभावाचे स्मरण करून त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “खाकी म्हणजे सेवा, त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक आहे.” सर्व खेळाडूंना नव्या विक्रमांसाठी शुभेच्छा देत त्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र पोलीस महा ऑलिम्पिक’चे स्वरूप प्राप्त झाल्याचे नमूद केले.
या स्पर्धेमुळे राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी एकत्र येत क्रीडांगणावर आपली क्षमता सिद्ध करत असून, “पोलिसांच्या पाठीशी खंबीर सरकार आणि जागतिक पातळीवर झेप घेणारे महाराष्ट्र पोलीस” असा स्पष्ट संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here