माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्यात अभियान ४.० व ५.० अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला, तर माळेगाव नगर पंचायतने द्वितीय पारितोषिक मिळवत आपली उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
या पार्श्वभुमीवर मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी ह्या दोन्ही नगरपरिषद व नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मनापासून अभिनंदन केले. “मी स्वतः स्वच्छतेच्या क्षेत्रात काम केले असल्यामुळे या यशाचा मला सार्थ अभिमान आहे. ज्या कार्याबद्दल मा. अजितदादांना सर्वाधिक जिव्हाळा होता, त्याच कार्यासाठी आज बारामती नगरपरिषदेला व माळेगाव नगर पंचायतला हा सन्मान मिळाला, यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे. बारामती जगात अव्वल क्रमांकावर यावी, हे त्यांचे स्वप्न होते. बारामतीच्या विकासासाठी ध्यास घेतलेला खरा माणूस म्हणजे दादा. हे यश टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी अधिक जोमाने काम करणे आवश्यक आहे. फक्त दादांची आठवण काढून चालणार नाही; त्यांच्या विचारांना कृतीची जोड देणे गरजेचे आहे. म्हणूनच झटून कामाला लागा. दादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. पुढच्या पायरीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, यश नक्की मिळेल.” अशा भावना यावेळी ना. सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.


















