* कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री चौधरी यांची प्राथमिक सहमती*
*मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये इंडिया स्किल स्पर्धेचे उद्घाटन*
गांधीनगर
राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातही प्रतिष्ठित राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा आयोजित होणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय कौशल्य विकास मंत्री ( स्वतंत्र कार्यभार) जयंत चौधरी यांनी दिले आहेत.
गुजरात मधील गांधीनगर इथे मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत रविवारी ‘पश्चिम क्षेत्र इंडिया स्किल स्पर्धे’ चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा (२०२८) महाराष्ट्रात आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री चौधरी यांच्या पुढे मांडला. त्यावर चौधरी यांनी याबाबतचे सकारात्मक स्पष्ट संकेत दिले.
चीन मधील शांघाय येथे या वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत.या अनुषंगाने केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय आणि ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात इंडिया स्किल राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्र विभागाच्या प्रमुख फेरी स्पर्धा होत असून यात मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील ३०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्रातील ११७ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यापुढील स्पर्धा नोएडा येथे होणार असून त्यानांनातर अंतिम स्पर्धक चीन मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
गांधीनगर इंडिया स्किल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पर्धकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. कौशल्य स्पर्धेचे हे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी उज्जवल भविष्याची दिशा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या नंतर त्यांनी कौशल्य विकासाकडे लक्ष केंद्रित केले. राज्यातील तरुणांना आणि विविध संस्थांमधील प्रशिक्षक यांना जगभरातल्या विविध भागात केवळ कौशल्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. त्यांच्या दूरदृष्टीने आज भारताच्या विकासात कौशल्य विकासाचे योगदान स्पष्ट झाले आहे. प्रधानमंत्री मोदीजी यांनी ‘ पीएम सेतू ‘ योजना सुरू करून देशभरातील कौशल्य विकासाची गती वाढवली आहे. मोदीजी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला असून ही यात कौशल्य विभागाचे मोठे योगदान ठरणार आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यात विविध योजना यशस्वीरित्या राबवण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात कौशल्य विकासाचे कॅपिटल म्हणून उदयास येत असल्याचे,गौरवोद्गार ही त्यांनी काढले.
भारत हा तरुणांना देश असून युवाशक्ती हीच विकसित भारताच्या संकल्पनेतील केंद्र बिंदू असून याच आधारावर आदरणीय प्रधानमंत्री कौशल्य विकासावर भर देत असल्याचे, केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी यावेळी सांगितले.
चीनमधील शांघाय इथल्या जागतिक कौशल्य स्पर्धेत यांत्रिकी(Mechatronics), वीज संच मांडणी (Electrical Installations) इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, औद्योगिक तंत्रज्ञान, सायबर सेक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञान या सहा कौशल्य क्षेत्रांशी संबंधित विद्यार्थी आपले प्रकल्प सादर करणार आहेत. भारतीय विद्यार्थी यात कुठेही कमी पडणार नाहीत. महाराष्ट्रातील दोन स्पर्धकांनी गेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले असून या स्पर्धेतही नेत्रदीपक यश विद्यार्थी मिळवतील असा विश्वास व्यक्त करत मंत्री लोढा यांनी पुढील स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत..


















