महानगरपालिका निवडणुकीत उबाठा गटाचा पराभव अटळ आहे, हे लक्षात येताच संजय राऊत यांनी मतदानाच्या दिवशी “दिसेल त्याला ठोका” अशी भाषा वापरली. ही भाषा लोकशाहीची नसून राजकीय अराजकता आणि गुंडशाहीला प्रोत्साहन देणारी आहे.
लोकशाही ही मतदान प्रक्रियेतून चालते, दंडुक्याने नाही, हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यायला हवे.
पैसा कुठून आला, कसा आला, असे आरोप करत राहण्यापेक्षा संजय राऊत यांनी एक तरी ठोस पुरावा लोकांसमोर मांडावा किंवा सक्षम यंत्रणेकडे तक्रार दाखल करावी. वायफळ आरोप आणि कोड्यात बोलणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा सवाल भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
“निवडणूक आयोगाने एक दिवस दान दिला” असे विधान करून संजय राऊत यांनी स्वतंत्र आणि संविधानिक संस्थेचा उघड अपमान केला आहे. पराभव दिसू लागला की संविधानिक संस्थांवर आरोप करण्याची ही जुनी सवय आहे.
भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत यांना मुळीच नाही.
पत्राचाळ घोटाळा, कोविड काळातील गैरव्यवहार आणि मुंबई महानगरपालिकेत वर्षानुवर्षे झालेला भ्रष्टाचार हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरून काढण्याचे पाप ज्यांनी केले, त्यांनी आज शुचिता शिकवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.
















