विकसित भारताच्या संकल्पनेत देशी कंपन्यांना संधी मिळाली पाहिजे – ना. मंगलप्रभात लोढा
मुंबई
“विविध विभागात विकासात्मक उपक्रम राबवण्यासाठी सध्या परदेशी कंपन्यांना केवळ सल्ल्यापोटी लाखो कोटी रुपये दिले जातात. त्या बहुराष्ट्रीय कंपन्या गब्बर फायदा कमवून कर त्यांच्या देशात भरतात. हे चित्र आता बदलण्याची आवश्यकता असून विकसित देशाच्या संकल्पनेत भारतीय विचारांच्या कंपन्यांना संधी मिळाली पाहिजे.” असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये आज वांद्रे येथे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड गव्हर्नन्स (CPRG) आयोजित ‘नगरी’ – द फ्युचर ऑफ सिटीज या परिसंवादाचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते. विकसित भारताच्या शहरांचे नियोजन या दृष्टीकोनातून या परिसंवादात भविष्यातील पायाभूत सुविधा या विषयावर राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनीही व्हिडीओ कॉन्फरनसिंग द्वारे मार्गदर्शन केले.
मंत्री लोढा यावेळी म्हणाले की, “भारतीयांचे हित टाळून परदेशी सल्लागार कंपन्यां भारतातून लाखो कोटींची लूट करत आहेत. आकड्यात सांगायचे झाल्यास सुमारे एक लाख कोटींपेक्षा जास्त या कंपन्यांवर खर्च होत आहे. या कंपन्यांना झालेल्या भरमसाठ फायद्यातून या कंपन्या त्यांच्या देशात कर भरतात. तर त्यांच्यासाठी काम केलेल्या भारतीयांना केवळ तुजपूंजी रक्कम देतात. भारतीयांच्याच कौशल्याचा वापर करून त्या कंपन्या गडगंज होत आहेत. या परिस्थितीत भारतीय विचारांच्या स्वदेशी कंपन्यांना अधिक बळ देण्याची वेळ आली असल्याचे, मंत्री लोढा म्हणाले.
“त्याचबरोबर केवळ मोठे रस्ते, मोठ्या इमारती आणि वाहतूक व्यवस्था म्हणजे विकसित शहरांची संकल्पना नाही तर, भौतिक सुविधांबरोबरच आपल्या संस्कृतीची सांगड घातली गेली पाहिजे. मुंबईतल्या मालाड मालवणी भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी आहे, कोणत्याही शहराच्या सुरक्षेसाठी हे योग्य नाही भविष्यात घुसखोरी रोखण्यासाठीही परिणामकारक यंत्रणा असणे अत्यावश्यक झाले असल्याचे परखड मत मंत्री लोढा यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम हातात आपला देश असून लवकरच आपण विकसित राष्ट्राच्या अग्रणी भागात असू .”असा दृढ विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड गव्हर्नन्स (CPRG)चे संस्थापक व संचालक डॉ. रामानंदजी पांडे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत मंत्री लोढा यांनी त्यांच्या CPRG संस्थेसोबत कौशल्य विकास विभागाचे काम करण्याचा मानस असल्याचेही यावेळी सांगितले. या परिसंवादाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यावेळी उपस्थित होते.

















