स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

*ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचे कार्य आजदेखील दिशादर्शक-उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे*

मुंबई, दिनांक १३ नोव्हेंबर २०२५-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,
“स्व. वसंतदादा पाटील हे सहकार क्षेत्राचे खरे शिल्पकार होते. ग्रामीण विकास, दुग्धविकास,शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतो.”
डॉ. गोऱ्हे यांनी स्व.वसंतदादांची आठवण सांगताना नमूद केले की,
“पुण्यातील मंजुश्री हुंडाबळी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी यासाठी आम्ही अडीच लाख महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन घेऊन स्व.वसंतदादा पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी आमची भूमिका ऐकून घेतली आणि महाराष्ट्र शासनामार्फत पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यास संमती दर्शवली. हा त्यांच्या संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा अत्यंत प्रेरणादायी अनुभव होता.”
त्या पुढे म्हणाल्या,“वसंतदादा पाटील यांच्याकडे जनतेशी संवाद साधण्याचे आगळेवेगळे कौशल्य होते. त्यांच्या नेतृत्वशैलीत माणुसकी, व्यवहारज्ञान आणि जनहिताची तळमळ दिसून येत असे.शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी आपण प्रयत्न करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे, उपसभापती यांच्या कार्यालयाचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वांनी स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.






















