*’जिथे कमी तेथे आम्ही’ या संकल्पनेतून शिवसैनिकांनी काम करावे… डॉ.गोऱ्हे*
धाराशिव,
अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागातील नागरिकांना जीवनावश्यक मदत तातडीने पोहोचवण्याचे, आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
धाराशिव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पूरपीडित भागातील अडचणींचा आढावा घेण्यात आला. जीवनावश्यक किराणा मदत किट, औषधे आणि अन्नपदार्थांचे वितरण यावर विशेष भर देण्यात आला. पुरबाधित नागरिकांना शिजलेले अन्न उपलब्ध करून देण्यासाठी देखील स्वतः त्यांनी विशेष मदत केली आहे. ‘जेथे कमी तेथे आम्ही’ या भूमिकेतून शिवसैनिकांनी काम करावे.” असे आवाहन देखील डॉ.गोऱ्हे यांनी केले.
डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, पूरबाधित गावांची यादी त्वरित सादर करावी. “मा. ना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. शाळांच्या दुरुस्तीचे काम शिक्षण विभागामार्फत करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली. मदत किट वाटप करताना औषधोपचाराची गरज तपासण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
विशेषतः वृद्ध, एकल व्यक्ती आणि लहान बाळ असलेल्या महिलांना प्राधान्य द्यावे, असे सांगून त्यांनी “गृहभेटी घेऊन प्रत्येक घरात मदत पोहोचली आहे की नाही, याची खात्री करा,” असा स्पष्ट आदेश दिला.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संरक्षक भिंती उभारण्याची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. “सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत स्थलांतरित झालेल्यांना अन्नपदार्थ आणि सोयी उपलब्ध करणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच बाधित पशुधनावर औषधोपचार करण्यावरही त्यांनी भर दिला.
असंघटित क्षेत्रातील व्यवसायिकांची नुकसानीचा सर्वे करून महामंडळामार्फत मदत मिळवून देणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. “शिवसेनेच्या तत्त्वानुसार पदाधिकाऱ्यांनी गावे वाटून घेऊन प्रत्येक घरात जाऊन मदत पोहोचली आहे का, हे तपासावे,” असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भारती गायकवाड, अर्चना दराडे (धाराशिव), जिल्हाध्यक्ष मोहन पनोरे (तुळजापूर, उमरगांव, लोहारा), शहर प्रमुख आकाश कोकाटे (धाराशिव), युवा सेना उपजिल्हाप्रमुख आदित्य हंबीरे (धाराशिव), ओबीसी शहर प्रमुख यश हंचाटे (धाराशिव), तालुकाप्रमुख अमोल जाधव (तुळजापूर), जिल्हा संघटक किरण ताई निंबाळकर (धाराशिव), तालुका प्रमुख माया चव्हाण (धाराशिव), तालुकाप्रमुख आशा अव्हाड (कळंब), शहर प्रमुख महादेवी माळी (धाराशिव) आदी मान्यवर उपस्थित होते.



















