*मुंबई :
“भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने, कंत्राटी पद्धतीने १७,४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.”अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
“या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून ३० हजार रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण -तरुणींनी घ्यावा.” असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.*
‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’ च्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, ‘बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. अर्थात, ही ई-निविदा प्रक्रिया ६ प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे ३०,०००/- वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
बसेसची वाढती संख्या, त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल.” असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.






















