*मुर्तिकारांना तब्बल ९९० टनहून अधिक मोफत शाडू माती वाटप*
*सुमारे १०२५मुर्तिकारांना मंडपासाठी मोफत जागा*
*पर्यावरणस्नेही उत्सवासाठी प्रायोगिक तत्त्वावर मुर्तिकारांना १० हजार ८०० लीटर नैसर्गिक रंग वाटप*
*सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी मंडप उभारणीकरिता एक खिडकी योजना*
* श्रीगणेशोत्सव मंडळ स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण*
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणाऱ्या श्री गणेशोत्सवासाठी जास्त पर्यावरणपूरक मुर्ती घडवाव्यात, नागरिकांनी पर्यावरण स्नेही मुर्ती खरेदी करावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले. या उपक्रम अंतर्गत यावर्षी ९९० टन शाडू माती मोफत देण्यात आली. १०२२ मुर्ती घडविण्यासाठी मंडप उभारण्याकरिता जागाही मोफत देण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर मूर्तीकरांना नैसर्गिक रंगांचेही वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी आता मुंबईकरांनी देखील जास्तीत जास्त पर्यावरणपूरक शाडू मातीची मुर्ती खरेदी करून तिची प्रतिष्ठापना करावी आणि उत्सवानंतर कृत्रिम तलावातच मुर्तीचे विसर्जन करावे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने यावर्षी २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत. मुंबईकरांनी या कृत्रिम तलावात मुर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने यंदापासून श्रीगणेशोत्सवास ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून घोषित केले आहे. गणेशोत्सव हा मुंबईचा सांस्कृतिक मानबिंदू मानला जातो. गणेशोत्सव कालावधीत देश-विदेशातून पर्यटक मुंबईत येतात. या सर्व पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा महागणेशोत्सव अधिक उत्साहात आणि नियोजनबद्धपणे तसेच निसर्गस्नेही पद्धतीने साजरा करण्यासाठी भरघोस प्रयत्न केले आहेत. उत्सव कालावधीतील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा – सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे, उपाययोजना करण्यात येत आहेत.
माननीय न्यायालयाचे आदेश, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची मार्गदर्शक तत्त्वे, त्यांना अनुसरुन शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना यांचे अनुपालन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. असे नमूद करुन त्याबाबत महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.
*यंदा २७५ पेक्षा अधिक कृत्रिम तलाव -*
श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून संपूर्ण मुंबई महानगरात मिळून २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आहे. भाविकांनी घरगुती निसर्गस्नेही गणेशमूर्ती घरी बादली / पिंप यामध्ये विसर्जित करावी. अथवा सोसायटीतील नागरिकांनी एकत्रितपणे व्यवस्था करुन मूर्ती विसर्जन करावे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्ती कृपया आपल्या जवळच्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित कराव्यात.
*असे करा विसर्जन -*
निसर्गस्नेही असो किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मध्ये घडवलेल्या मूर्ती, अशा सर्व मूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण मुंबईत कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या तलावांमध्ये भाविकांनी मूर्ती विसर्जित करावी. तलावांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच यादी पाहण्यासाठीचे क्यूआर कोड विविध माध्यमातून प्रकाशित करण्यात येत आहेत. त्यानुसार आपल्या घरानजीकचा तलाव शोधून तेथे मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईतील नागरिकांनी पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती खरेदी करावी, पर्यावरणपूरक साहित्यानेच बाप्पाची मखर आणि इतर सजावट करावी, यासाठी महानगरपालिकेने विविध स्तरांवरुन जनजागृती मोहीम राबविली आहे. यासाठी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे.
*सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्यां स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण-*
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसे करावे, याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळातील १ हजाराहून अधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. श्रीगणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोणती काळजी घ्यावी, गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे – काय करू नये, धोके कसे ओळखावेत, आपत्कालीन प्रसंगी कोणती कार्यवाही करावी आदी पैलुंबाबतचे प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात आले आहे. समवेत प्रात्यक्षिकेही करुन घेण्यात आली आहेत.
*निर्माल्य संकलनासाठी सेवा-*
प्रत्येक मंडळाने श्रीगणेशोत्सव कालावधीत निर्माल्य साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था करावी. निर्माल्याचे व्यवस्थित वर्गीकरण करावे. तसेच ज्यापासून खत तयार करता येऊ शकत नाही, असे पदार्थ वेगळ्या डब्यात जमा करावे. संकलित होणारे निर्माल्य हे महानगरपालिकेच्या निर्माल्य वाहनास हस्तांतरित करावे. अधिक माहितीसाठी नजीकच्या प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
***


















