*देवळाली, इगतपुरी विधानसभा मतदारसंघामधील उबाठा, शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादीत…*
मुंबई दि. १२ ऑगस्ट – “लोकांची कामे केली तर ,लोकं आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा… त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हा…” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज कार्यकर्त्यांना केले.
नाशिक जिल्हयातील देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील उबाठा आणि वंचित, शरदचंद्र पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज जाहीर पक्षप्रवेश केला.
:शेतकरी, युवकांसाठी कुशल रोजगार देणार्या योजना सरकार राबवत आहे. केंद्रसरकारने राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट दिले आहे. आपापल्या भागात या योजनांचा लाभ लोकांना कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. जितके लोकांपर्यंत पोहोचाल तेवढा पक्षवाढीला हातभार लागणार आहे असे सांगतानाच स्वातंत्र्याची ७८ वर्षे पूर्ण होत आली तरी अजूनही काही लोकं बेघर आहेत त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या या घरकुल योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे.” असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
“पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात. अरे निवडणूक आयोग जर चुकत असेल तर, न्यायव्यवस्था आहे ना ” असा संतप्त सवाल करतानाच “मी बारामतीतून सलग निवडणूका जिंकलो आहे त्यात कधी असे काही घडले नाही.” हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
नाशिक जिल्हयातील देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी संघाचे नाशिक तालुकाध्यक्ष शरद गायके , शरदचंद्र पवार गटाचे नाशिक तालुकाध्यक्ष विष्णू थेटे, सचिन पिंगळे यांच्यासह नाशिक जिल्हयातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर येथील वंचित आघाडीचे नेते कृष्णा काशीद यांनीही आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, आ सरोज अहिरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आ. शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, आ. संजय खोडके, आ. हिरामण खोसकर, आ. राजेश विटेकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, उमेश नेमाडे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदी उपस्थित होते.














