*नाशिक, दि. 3:* महाराष्ट्र शासन-कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेति) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी “जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र उद्घाटन सोहळा” रामेति आवार, संभाजी चौक, उंटवाडी रोड नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन
क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले उपस्थित होते.
तालुका स्तरावर देखील शेतकरी, शेतकरी महिला व पुरुष गट यांच्यासाठी कृषि विभाग व इतर संबंधित विभागांनी थेट विक्रीकरिता जागा व दालने उपलब्ध करून द्यावीत आणि नियमित विक्री सुरू ठेवावी असे मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. त्याचबरोबर आपल्या शेतमालाला प्रतवारी व मूल्यवर्धन करून शहरी ग्राहकांना आकर्षित करावे लागेल असे नमूद केले.
या महोत्सवात आंबाडी, आघाडा, अळू, अंबाडी, गुळवेल, चंदनबटवा, टाकला, टेकोळे, रानमेथी, भोकर, माठ, शेवगा, कळलावी, कळथी, चाकवत, चवळी, घोळ, करटोली, कळलावी, कळथी, कळवण, कळंबी, कातळ, कौल, कोंबडा, कोथमीर, खटा, गवार, चांग, चांगरी, चाकवत, चिंच, चिवळ, चोलाई, जांभूळ, टेंभू, तोंडली, दूर्वा, पिठवण, बोर, भोपळा, भारंगी, भेंडी, भोकर, माठ पावसाळयातील रानभाज्या उपलब्ध असणार आहेत.
शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी रामेति आवार, संभाजी चौक, उंटवाडी रोड नाशिक हे विक्री केंद्र सुरु करण्यात येत असून सर्व नागरिकांनी, ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागामार्फत यानिमित्ताने करण्यात आले.
यावेळी शहरातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात रानभाज्यांची माहिती घेतली तसेच रानभाज्याही खरेदी केल्या. तसेच या महोत्सवाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी शिवाजी आमले (प्राचार्य रामेति, नाशिक ) सुनिल वानखेडे (नोडल अधिकारी, विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, नाशिक विभाग नाशिक) श्री. रवींद्र माने (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, नाशिक) श्री. अभिमन्यू काशिद (प्रकल्प संचालक आत्मा नाशिक) श्री.विलास सोनवणे (प्रकल्प उपसंचालक आत्मा नाशिक) त्याचबरोबर विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी महिला व पुरुष गट, रानभाजी पाककृती गट ग्राहक आणि पत्रकार बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र माने (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, नाशिक) यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभिमन्यू काशिद (प्रकल्प संचालक आत्मा नाशिक) यांनी केले.



















