Home मुंबई घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा आरोपी उबाठाचा कार्यकर्ता – उदय सामंत

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा आरोपी उबाठाचा कार्यकर्ता – उदय सामंत

179
0

*घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा आरोपी भावेश भिंडे उबाठाचा कार्यकर्ता*

*मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट*

*नगरसेवकांनी २४० तक्रारी केल्यानंतर भिंडेवर कारवाई नाही*

मुंबई, ता. १४ मे २०२४

मुंबईतील घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे हा उबाठामध्ये काम करण्यास तयार झाला होता मात्र त्याच्याकडे मुंबईतील होर्डिंगची जबाबदारी देण्यात आली. त्याला मुंबई महापालिकेतून होर्डिंग देण्यात आली आणि त्याबदल्यात उबाठाच्या नेत्यांचे वाढदिवस आणि निवडणूक प्रचारासाठी या बेकायदा होर्डिंगचा वापर झाला, असा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला. भिंडे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो यावेळी मंत्री सामंत यांनी दाखवले.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबतची महत्वाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, भावेश भिंडे याच्यामागे मोठी राजकीय शक्ती आहे. भिंडे हा प्यादा असून ही होर्डिंगचा खरा मालक आणि सूत्रधार शोधण्याची आवश्यकता आहे. भिंडेवर अनधिकृत होर्डिंग लावण्याचे, झाडे मारल्याचे २१ गुन्हे दाखल आहेत.

घाटकोपर येथील होर्डिंगबाबत स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेला २४० तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला. शिवसेना विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनी देखील तक्रार केली होती. मात्र मागील तीन साडेतीन वर्षात भिंडेने होर्डिंग काढणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेत उबाठाची २५ वर्ष सत्ता होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग या भिंडेला कोणी मोठे केले. त्याला कोणाचा आशिर्वाद आहे, असा प्रश्न मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला. भिंडेला राजाश्रय होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

होर्डिंग दुर्घटनेत १४ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्याबाबत संवेदना आहे. मात्र उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण उबाठावर शेकू नये, म्हणून राऊत यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप मंत्री सामंत यांनी केला.

ज्यांच्या प्रचाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे लागतात आणि बॉम्बस्फोटातील आरोपी फिरतात याबाबत उबाठाने जनतेला उत्तर द्यायला हवीत. काल उबाठा उमेदवारांच्या रॅलीमध्ये हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोखाली काँग्रेसचा हाथ ही निशाणी होती. उबाठाने बाळासाहेबांचे विचार सोडले असून त्यांना विलीन करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. उबाठा राहुल गांधींच्या विचाराने चालत आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here