*अधिवेशन संपल्यानंतर नंदूरबारहून राज्याचा दौरा सुरू करणार – अजित पवार*
मुंबई दि. १ जुलै – पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर नंदूरबारहून राज्याच्या दौरा सुरु करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली.
महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे आज गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, नागपूर, हिंगोली, अहिल्यानगर, आणि मानखुर्द शिवाजीनगर येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला सर्वांना सोबत घेऊन महिला, युवक, युवती यांना संधी द्यायची आहे असे सांगतानाच अजितदादा पवार यांनी यापुढे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे चार दिवस पक्षाला देणार असल्याचे जाहीर केले.
पक्षात येणाऱ्या लोकांचा नक्कीच मानसन्मान राखला जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
शरदचंद्र पवार गटाचे जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी यावेळी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याशिवाय गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्यानगर, परभणी, नागपूर, हिंगोली, या जिल्हयातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेतील विविध पक्षातील पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आमदार सना मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मानखुर्द – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सपाच्या महिला व पुरुष पदाधिकारी यांनीही मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक, आमदार राजेश विटेकर,आमदार राजू नवघरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश पदाधिकारी सुरेखाताई ठाकरे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,आमदार डॉ. किरण लहामटे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.



















