किल्ल्यावर सत्ताधाऱ्यांची झुंडशाही
वाऱ्याने साधा नारळ पडला नाही; महाराजांचा पुतळा कसा पडला?
पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर ओढले आसूड
मालवण,
लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्यासाठी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारला. महायुतीच्या टक्केवारीच्या धोरणामुळे या पुतळ्यात सरकारने पैसे खाल्ले. त्यामुळे पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. परिणामी केवळ आठ महिन्यात हा पुतळा कोसळला. सर्वांची मान शरमेनं खाली गेली. महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट महायुतील मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार आसूड ओढले.
सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना श्री. वडेट्टीवार बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीने गुजरातकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. पंडित नेहरूंच्या हस्ते अनावरण झालेले पुतळे आजही भक्कम स्थितीत आहेत. महायुतीच्या चोर, लुटारू, डाकू यांनी महाराष्ट्र लुटला आहे. पुतळा उभारणारा जयदीप आपटे
२४ वर्षाचा आहे. त्याला अनुभव नसताना मूर्ती करायला दिली. आता तो फरार आहे. या परिसरात एक नारळ पडत नाही. छप्पर पडले नाही. पुतळा कसा पडला हा प्रश्न आहे. साधी ताडपत्री उडाली नाही. मुख्यमंत्री वाऱ्याचा वेगाचे कारण देत आहेत.
महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान मोदींच्या केले. एक वीटही अजून रचली नाही. या सरकारकडून काही होणार नाही. त्यामुळे जनता महायुतीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही किल्ल्यावर पाहणी करायला गेलो. त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गुंडगिरी केली. या ठिकाणी झुंड शाही आहे. ही झुंडशाही आता जनता खपवून घेणार नाही असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला.
















