*गुणी अभिनेता ऋषिकेश कानडे काळाच्या पडद्याआड ; अवघ्या ३८व्या वर्षी घेतली ‘एक्झिट’*
मुंबई, दि (प्रतिनिधी) :
पुण्यातील एक हरहुन्नरी आणि अतुलनीय अभिनेता ऋषिकेश कानडे याचे आज पहाटे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय अवघे ३८ वर्षांचे होते.
अजात शत्रु असलेला ऋषिकेश एक प्रगल्भ अभिनेता तर होताच पण देशप्रेमाने पूर्ण भारलेला होता. तो मुख्य भूमिका करत असलेल्या ‘मी भारतीय ‘ ह्या दिर्घांकाचे जवळपास ३०० प्रयोग करतांना त्याच्या देशप्रेमाचे प्रत्यंतर यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान देताना तो महाराजमय होऊन जायचा. त्याने केलेल्या प्रत्येक भूमिका तो जगला, त्यामुळे प्रेक्षकांच्या ह्रदया पर्यंत पोहोचला.
त्याला राज्य नाट्य स्पर्धेत दोन वर्ष अभिनयाच्या रौप्य पदकाने गौरवले होते.
त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण आणि पत्नी असा परिवार आहे. ३ ऑगस्टला संध्याकाळी ऋषिकेशवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वत:चा ऑनलाईन फिटनेस क्लब चालवणाऱ्या ऋषिकेशच्या निधनाने पुण्याच्या रंगकर्मींमधे हळहळ व्यक्त होत आहे.


















