*स्त्रियांनी स्वतःला मानसिकरित्या मजबूत करण्याची आवश्यकता ! -ऋचा सुनील पारेख, नवी मुंबई.* समाजातली एक विदारक स्थिती म्हणजे बहुसंख्य मानवी जीवन हे एका अस्थिरतेने वेढले गेलेले आहे. व्यवसाय,नोकरी,मुलांचं भविष्य, आर्थिक चणचण, अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा, स्वाभिमानाशी तडजोड, अंतर्मनातली भीती, असुरक्षितता अशांतता ही खोलवर रुजलेली असते. या सगळ्यात काय हाती लागेल याची निश्चिती नाही आणि हाती लागलेलं किती टिकेल याची शाश्वती नाही.
समाजात एका बाजूला कर्मकांड परंपरा, रितीरिवाजांचे ओझे मणभर आणि शास्त्रीय आधार कणभर! परिवर्तनाची दुर्बलता ढीगभर! अशी अवस्था आहे. महिलांच्या बाबतीत बोलायलाच नको. यातून भस्मधारी, तावीजधारी, जटाधारी भोंदूबाबाची पैदास जन्म घेते. शब्द अयोग्य असला तरी या ढोंगी माणसांच्या स्तराला शोभेल असा आहे.
कुठलाही धर्म, धार्मिक कार्य, रूढी, परंपरा कधीच वाईट नसतात किंवा चुकीच्या नसतात परंतु धर्माला, शास्त्राला तोडून कुस्करून चुकीच्या हेतूने त्याची अर्थहीन कर्मकांडं असले ढोंगी लोक स्वहितासाठी, समाजव्यवस्थेत अडथळा आणण्यासाठी करतात तेव्हा मात्र कठोर विरोध करणं आवश्यक असतं.
धर्म कल्पना आणि कर्मकांडाचे पाठबळ याची सरमिसळ करून तथाकथित बाबा म्हणजे भंपकपणाचा कळस. खरी यातना ही आहे की यांचं भरणपोषण राजकारणी लोक सर्रास करत असतात. सुशिक्षित वर्ग देखील सारासार बुद्धी गहाण ठेवून करत असतो. यांच्या शोषणाचा मूळ गाभा बनतो महिलावर्ग! स्त्रीच्या दुबळ्या भावनाशील मनाला तात्पुरता आधार देत अघोरी,जीव घेणं,अप्रिय कृत्य सर्रास केलं जातं आणि अशा तिलकधारी गुन्हेगारांना कायदा स्पर्शही करत नाही. यदाकदाचित कायदा जागृत झाला तरी सिस्टम द्वारा झोपवला जातो.
जसं घेऊ तसं मिळतं. संस्कृतीच्या गाभ्याशी आत्मा असतो नाहीतर अंधविश्वास. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा सगळं परिवर्तन स्वीकार करू शकता पण जर अंधविश्वासाचा गाभा असेल तर समोर आलेल्या ढोंगी बाबाला नतमस्तक होणं श्रद्धेचा विषय होतो कारण बाह्य परिवर्तन स्वीकारता आलं असलं तरी आंतरिक परिवर्तन शून्य असतं!
महिलांवर अत्याचार तंत्र-मंत्र, ज्योतिष,जादूटोणा या प्रकारातून होतात कारण त्यांच्यातल्या आत्मविश्वासाची कमतरता! याला खतपाणी कुटुंबातूनच घातलं जातं. तू कमजोर आहेस, तू मुलगी आहेस, तुझ्यावर चेटकिणीची सावली आहे, तुला मूल होत नाही, तू पुत्र जन्माला घालू शकत नाही 1000 कारणं माथी मारली जातात. हे असंख्य अपमानास्पद टोमणे बाईला सरळ *बाबामार्गावर* घेऊन जातात. अनेक ठिकाणी घरचे सदस्य च या वळणावर आणून सोडतात. बाबा नावाचा पगडाच इतका प्रचंड असतो मानस पटलावर की त्याचं अनैतिक कृत्य देखील नजरेआड केलं जातं. ज्या स्त्रिया या विरुद्ध आवाज उठवतात त्यांचा आवाज आधी घरातले आणि नंतर समाज दाबून टाकतो. तोंड दाबून मुक्यांचा मार सहन करत ती स्त्री मूकपणे तो अत्याचार सहन करत जाते आणि तिच्या या मौनाला मूकसंमती मानली जाऊन वारंवार हा अत्याचार घडत असतो. अनेक वेळा धमकी दिली जाते –
“माझ्या इच्छेनुसार वागली नाहीस तर तुझं कुटुंब बरखास्त होईल.”
हे भय कधीच न संपणारं आहे.
नुकताच नाशिक मध्ये झालेला भोंदू बाबा प्रकार आपल्या ऐकण्यात,वाचण्यात आणि बघण्यात येतो आहे. प्रचार माध्यमांनी त्याला कितीही प्रसिद्धी दिली किंवा गुपित उघडी केली तरी त्याच्या हातून घडलेले अत्याचार राजकीय छत्र असेपर्यंत कालांतराने पुसले जातील. जोपर्यंत पीडित झालेल्या सगळ्या स्त्रिया स्वतःवरच्या अन्यायाला वाचा फोडत नाहीत तोपर्यंत हे ढोंगी बाबा सकुशल समाजात वावरत राहतील.
स्त्रियांचं हे मौन त्यांना किती अंधाऱ्या डोहात नेत आहे हे त्याचं त्यांनादेखील उमगत नाही.
या प्रकारातून मुक्तता मिळवण्यासाठी स्त्रियांना आर्थिक, सामाजिक,शारीरिक आणि मानसिक पोषण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. स्त्रियांनी स्वतःला रोज थोडं थोडं जरी मानसिकरित्या मजबूत केलं तरी जीवन जीवन उद्ध्वस्त होण्यापासून त्या वाचू शकतात.
*-ऋचा सुनील पारेख, नवी मुंबई, +91 99301 21490 (लेखिका या साहित्यिक आहेत.)*



















