मुंबई, दि. २५ मे २०२६ : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. अभियानांतर्गत विविध स्तरांवरील मूल्यमापन प्रक्रियेला सुरुवात झाली असून, त्याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.
ग्रामीण विकासाला अधिक गती देण्यासाठी राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतींच्या तालुका, जिल्हा आणि विभागस्तरीय मूल्यमापन प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या.
सुशासनयुक्त पंचायत, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित ग्रामव्यवस्था, सामाजिक न्याय तसेच गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण या महत्त्वाच्या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावे आणि गावपातळीवर विकासाची सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
मूल्यमापन प्रक्रिया अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी पद्धतीने पार पडावी, तसेच ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक चालना मिळावी यासाठी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
याप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.



















