बाळासाहेब मियाँदादच्या घरी केक खायला गेले नव्हते-उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आज भाजपच्या देशभक्तीवर कडाडून प्रहार केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याचा दाखला देत भाजपभाईंवर कडाडून हल्ला चढवला. भारत-पाक सामन्यावरून त्यांनी तीव्र नाराजी जाहीर केली.
आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात उद्या भारत-पाक सामन्याविरोधात होणाऱ्या शिवसेनेच्या आंदोलनाची माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी भाजपच्या देशभक्तीवर कडाडून प्रहार केला. एकीकडे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असं म्हणायचं आणि मग सामना खेळावायचा हे कसं चालेल असा सवाल त्यांनी केला.
“पाकिस्तानसोबत अवघ्या दोन महिन्यात तुम्ही क्रिकेट कसं खेळू शकता असा रोकठोक सवाल त्यांनी विचारला. दिवंगत सुषमा स्वराज यांची आठवण काढत, त्या परराष्ट्र मंत्री होत्या. तेव्हा त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटला विरोध केला होता. तेव्हा जयशंकर हे त्यांचे सेक्रेटरी होते. आता सेक्रेटरी परराष्ट्र मंत्री होत आहेत.” असा टोला त्यांनी लगावला.
*बाळासाहेबांवर बोलता तुमची औकात आहे का?* बाळासाहेबांच्या देशभक्तीवर संशय व्यक्त करताना, “औकातीत राहावं. बाळासाहेब जावेद मियांदादच्या घरी गेले नव्हते. मियांदाद मातोश्रीत आला होता. मोदींसारखं केक खायला गेले नव्हते. बाळासाहेबांनी मियांदांदला तोंडावरच सुनावलं होतं. त्यांनी भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला होता. त्यामुळे औकातीत राहूनच बोला. भाजपच्या अंधभक्तांनी बाळासाहेबांच्या देशभक्तीवर बोलू नये.” असा सज्जड दम उद्धव ठाकरे यांनी भरला.
*उद्या ठाकरेंचे आंदोलन*
आम्ही तर पाठवतोच. उद्या रविवार आहे. संध्याकाळी मॅच आहे. उद्या ११ वाजता महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चौकात जमतील आणि डब्यात सिंदुराच्या पुड्या टाकतील आणि हे सर्व सिंदुर मोदींना त्यांच्या कार्यालयात पाठवणार आहोत. ‘हर घरसे सिंदुर’ मोदींना पााठवणार आहे. आताच ही वेळ आहे. देशवासियांना सांगतो. मोदींना दमदारपणे सांगायला पाहिजे “की नही होगा.” असे उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून ठणकावले. ठाकरे सेनेची महिला आघाडी रविवारी ‘सिंदूर रक्षा आंदोलन’ करणार आहे. ‘माझं कुंक, माझा देश’ असे हे आंदोलन आहे.



















