Home Uncategorized *राज्यातील शेतकऱ्यांना ‘कृषीसमृद्ध’ भेट*

*राज्यातील शेतकऱ्यांना ‘कृषीसमृद्ध’ भेट*

83
0

*मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसादिनी नव्या योजनेची घोषणा*

*५ वर्षांसाठी रु २५ हजार कोटींची तरतूद – कृषी मंत्र्यांची माहिती*

नाशिक, दि. २२ : शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करतानाच हवामान अनुकूल, शाश्वत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन देत शेती उत्पन्नात वाढ करून शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी आणण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्य सरकारने नव्या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसादिनी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही ‘कृषीसमृद्ध’ भेट असल्याचे राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे. राज्याच्या कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याकरीता अर्थसहाय्य करण्यासाठी कृषी विभागामार्फत नव्यानेच योजना जाहिर करण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यास, त्यानुसार सन २०२५-२६ पासून पुढील ५ वर्षांमध्ये दरवर्षी रु.५ हजार कोटी अशी एकूण रु.२५ हजार कोटींची तरतूद करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी योजनेमुळे माझ्या शेतकरी बांधव-भगिनींच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी येईल, असा विश्वास कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे.
*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here