*मुंबई उपनगर पालकमंत्री एड आशिष शेलार यांचे पालिकेला निर्देश*
मुंबई, दि. 21
कंत्राटदारांनी ज्या पध्दतीने रस्त्यांच्या कामाचं नियोजन केले पाहिजे होत, ते केलेलं दिसत नाही. जे कंत्राटदार काम करत नाही त्यांच्यावर मजबूत दंड लावण्यात यावा असे निर्देश आम्ही दिलेत, असे मुंबई उपनगर पालकमंत्री एड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री आशिष शेलार यांनी आज पुर्व उपनगरातील रस्ते बांधणी कामाचा पाहणी दौरा केला. मुंबई पूर्व उपनगरातील एन वॉर्डमधील घाटकोपर येथील एम. पी. वैद्य मार्ग ते टिळक रोड जंक्शन या रस्त्याची पाहणी करताना असे निदर्शनास आले की, गेली ६ महिने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पहाटे सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर सोबत होते, ही सर्व परिस्थीती आणि नागरिकांचा रोष त्यांच्या लक्षात आणून दिला, आणि तातडीने या सर्व बाबतीत सुधारणा करा अशा सुचना मंत्री शेलार यांनी केल्या.
मुंबई पूर्व उपनगरातील एन वॉर्डमधील घाटकोपर पश्चिम ते विक्रोळी पार्क साईट रस्त्याची पाहणी करताना असे निदर्शनास आले की, येथील रस्त्यावर काही तासांपूर्वीच सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिक त्रासले असून त्यांनी कंत्राटदारांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
एस वॉर्डमधील भांडूप पश्चिम येथील अशोक केदारे चौक आणि टेंभी पाडा रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. या ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण असून, केवळ अर्धे काँक्रिटीकरण झाले आहे आणि रस्त्याची लेव्हल देखील योग्य केलेली नाही, अशी गंभीर स्थिती निदर्शनास आली.स्थानिक भाजप पदाधिकारी आणि नागरिकांनी कंत्राटदाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ही बाब महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून देत याबाबत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
या दौऱ्यात आमदार पराग शाह, आमदार मिहिर कोटेचा, माजी नगरसेवक नील सोमैया, प्रकाश गंगाधरे, भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत माध्यमांशी बोलताना, मंत्री शेलार म्हणाले की,
मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत आमची जबाबदारी म्हणून आम्ही प्रत्येक गल्लोगल्ली फिरू, आमच्या भूमिका सरकारला सांगू आणि काम करुन घेऊ.
आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे की, नवीन रस्ते उघडू नका.
एक बाजू रस्त्याची झाली असेल तर ती पूर्ण करा आणि जी दुसरी बाजू आहे त्याची लेवल करा जो राहादारीयुक्त असेल,जागरूक प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी रस्त्यावर आपल्या प्रतिनिधीना घेऊन कामाला लागलेय., असेही त्यांनी सांगितले.

















