Home Uncategorized *विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश*

*विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश*

213
0

जालना, दि. १६: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जालना येथील शासकीय विश्रांतीगृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विविध समस्या व योजनांची सखोल चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्देश दिले.

या बैठकीत अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी टंचाई, ऊसतोड कामगार व घरकाम करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पवार आणि कृषी अधिकारी श्री. कापसे यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी ऊसतोड कामगार महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य सर्वेक्षण राबवण्याची गरज असल्याचे नमूद केले. नोंदणीकृत कामगारांना ओळखपत्र देण्याबरोबरच घरकाम करणाऱ्या महिलांचेही सर्वेक्षण करून त्यांच्या माहितीची नोंद घेण्यावर त्यांनी भर दिला. केवळ मुलीची माता असल्याने योजनांपासून वंचित राहणाऱ्या महिलांनाही लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बालविवाहाच्या प्रमाणात घट झाली असली, तरी या समस्येवर अधिक प्रभावी जनजागृती हवी असून, समाजसेवी संस्थांची मदत घेऊन ग्रामपातळीवर मोहिमा राबवाव्यात, असे मत त्यांनी मांडले. पॉक्सो कायद्यान्वये पीडित मुलींसाठी पुनर्वसन व सशक्तीकरणाच्या उपाययोजना राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पोलिस विभागाने तयार केलेल्या बालजागरूकता पुस्तिकांचे वितरण समाजमाध्यम आणि बचत गटांच्या माध्यमातून करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे गट तयार करून महिलांविषयक कायद्यांची माहिती पोहोचवावी. जिल्ह्यातील बेपत्ता मुलींच्या प्रकरणांमध्ये तपास प्रक्रियेला गती द्यावी आणि अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यास सांगितले. तसेच जिल्हा स्तरावर बालस्नेही पोलीस स्टेशन सुरू करावयाचा असल्यास त्यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

राज्यात अलीकडील काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तसेच पावसाळ्यात वीज पडून होणारे अपघात रोखण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी वीज नियंत्रक उभारण्याचे आदेश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या मागणीवर तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ, प्र. पोलीस अधीक्षक नोपाणी व महिला बालविकास अधिकारी कोरे यांनी विविध योजनांची व परिस्थितीची सविस्तर माहिती सादर केली. सर्व संबंधित विभागांचे अधिकारी व इतर मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीद्वारे जिल्ह्यातील विविध सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय विषयांना चालना मिळून योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here