“शिवनेरी”ची जेष्ठ महिलेस
उद्धट वागणुक
एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी चांगली चालण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विशेष करून परिवहन मंत्री आणि या
महामंडळाचे अध्यक्ष ना. प्रताप सरनाईक हे जीवतोड प्रयत्न करीत आहेत,तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास,६५ वर्षांवरील ज्येष्ठांना आणि महिलांना अर्ध्या दराची तिकीट सवलत यामुळे एस टी प्रवाशांमध्ये लोकप्रियही होत आहेत; तर दुसरीकडे एस टी महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांच्या मनमानी आणि उद्धट वागणुकीमुळे प्रवासी त्रस्त होत असून संताप व्यक्त करीत आहेत.
नुकताच असाच एक संतापजनक प्रकार नवी मुंबईतील ज्येष्ठ महिला, सामाजिक कार्यकर्त्या अलका भुजबळ यांच्या बाबतीत घडला आहे. पुणे येथील घरगुती कौटुंबिक समारंभ आटोपून त्या शुक्रवारी संध्याकाळी पुणे स्टेशन वर आल्या .शिवनेरी बसचे तिकीट घेतानाच त्यांनी सानपाडा येथे उतरायचे असल्याचे सांगितले होते.
ही शिवनेरी बस संध्याकाळी ७.१० वाजता पुणे स्टेशनहून निघाली. बस रात्री अकरा च्या सुमारास जुईनगर येथे आली असताना,वाहन चालकाने मोठ्याने ओरडून जुईनगर येथे कुणाला उतरायचे आहे का? असे विचारले. अर्थात तिथे उतरणारे कुणी प्रवासी नसल्याने बस थांबली नाही. पण त्या दरम्यान बस सानपाड्याजवळ पोहोचू लागल्याने आपल्याला सानपाड्याला उतरायचे आहे,असे सांगून त्यांनी वाहन चालकास बस थांबविण्यास सांगितले. एरव्हीही एस टी आणि खाजगी बस गाड्या या सानपाडा रेल्वे स्थानकासमोर
थांबतच असतात. पण या बस चालकाने मध्य रात्रीची वेळ आहे, महिला प्रवासी एकटी आहे आणि त्यात पुन्हा सानपाडा रेल्वे स्थानकासमोर बस थांबत असते,याचा काही एक विचार न करता,
” सानपाड्याला बस थांबणार नाही.तुम्हाला वाशीलाच उतरावे लागेल” असे उद्धटपणे सांगून बेफाट बस रात्री सव्वा अकराच्या सुमारास वाशी फ्लाय ओव्हर च्या खाली थांबवली.इतक्या रात्री तिथे रिक्षा सुद्धा उपलब्ध नव्हती. त्यामुळे श्रीमती भुजबळ यांना तिथून पायी पायी वाशी रेल्वे स्टेशन गाठावे लागले. तिथून एका सज्जन रिक्षा चालकाने त्यांना घरी आणून सोडले.
एकीकडे महिला दिवसेंदिवस असुरक्षित होत असताना केवळ सौजन्य ,व्यावसायिक जबाबदारी म्हणूनच नाही तर त्यांची सुरक्षा लक्षात न घेता , या बस वाहन चालकाच्या बेजबाबदार वागणुकीबद्दल संताप व्यक्त करून एस टी महामंडळाने या कर्मचाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करावी तसेच एस टी च्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सौजन्याची वागणूक द्यावी अशी अपेक्षा श्रीमती भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

















