Home मुंबई नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट*-आ प्रविण दरेकर

नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट*-आ प्रविण दरेकर

190
0

*मास्टरमाईंड शोधून दंगेखोरांवर कारवाई करावी*

*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांची मागणी*

*स्वा. सावरकरांना विरोध करणाऱ्यांना*
*औरंगजेबाचा एवढा पुळका का?*

मुंबई- नागपूरच्या महाल भागात काल सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी परीस्थिती हाताळत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली खरी मात्र आज या हिंसाचाराचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी या घटनेचा निषेध करत ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचा मोठा आरोप केला. तसेच या घटनेमागील मास्टरमाईंड शोधून काढून दंगेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणीही दरेकरांनी केली.

सभागृहात बोलताना दरेकर म्हणाले कि, औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांची मजल किती वाढलीय हे कालच्या नागपुरातील घटनेने समोर आलीय. या घटनेच्या बाबतीत जी माहिती समोर आलीय ती सभागृहाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शेकडो दुचाकी फोडल्या गेल्या, स्थानिकांच्या वाहनांना टार्गेट केले गेले. दुकानांत तोडफोड करण्यात आली. महाल परिसरातील जुन्या महाविद्यालयाच्या मागील भागात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली. सायंकाळी ज्यावेळी दोन गटांत तणाव झाला तेव्हा सर्वात आधी जमावाने पोलिसांना टार्गेट केले. चिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाज कंटकांची धरपकड सुरू केल्यानंतर लोकांनी दगड फेकले. त्यात काही पोलीस गंभीर जखमी झाले. घराजवळ न सापडणारे मोठेमोठे दगड, स्टाईलचे टोकदार तुकडे, लाकडी दांडे दिसून आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांवरही दंगलखोरांनी दगड व चाकू फेकून मारले तर काहींनी थेट तलवारी फेकून मारल्या. यात हे जवानही जखमी झाले. समाजकंटकांच्या या हल्ल्यात १५ हून अधिक पोलिस कर्मचारी, अधिकारी जखमी झालेत. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात त्यांना गंभीर जखम झाली आहे.

दरेकर पुढे म्हणाले कि, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. नागपुरात घडलेली ही घटना पूर्वनियोजित कट होता. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या. त्या कुणी पसरविल्या याचा शोध पोलिसांनी घ्यावा. बाहेरून लोकं आणून कट रचून घडविलेला हा प्रकार आहे. महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण करायची, डोकी भडकावायची, कायदा सुव्यवस्था खराब करण्याचा काहींचा डाव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का? या घटनेची चौकशी होऊन त्यामागील मास्टरमाईंड कोण हे शोधून काढले पाहिजे आणि दंगेखोरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी असल्याचे दरेकर म्हणाले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here