Home Uncategorized विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण, उपसभापती डॉ....

विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती

185
0

विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, दि. २६ : विधान भवन, मुंबई येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६व्या दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “आज भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन आहे. २६ जानेवारीलाच भारतीय प्रजासत्ताक, स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्षामध्ये आले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना लागू झाली. त्याचसोबत भारतातल्या प्रत्येकाला कुठल्याही जातीचे, धर्माचे, वंशाचे किंवा स्त्री-पुरुष कुणीही असो प्रत्येकाला व्यक्तिगत स्वरूपाचे अधिकार प्राप्त झाले. ते अधिकार भाषण, विचार, आचरण स्वातंत्र्याशी संबंधित आहेत. कुठल्याही प्रकरणी कोणालाही कुणासोबत दुजाभाव करता येणार नाही असं देखील त्याच्यामध्ये अधोरेखित करण्यात आले. या ७५ वर्षांमध्ये देशात बरेच बदल झालेले आहेत. पहिल्या 25 वर्षांमध्ये लोकशाहीचे अधिकार आणि त्याचे उल्लंघन यासंदर्भामध्ये मोठी राजकीय आंदोलने झाली, आणीबाणीचा काळ त्यामध्ये लोटला आणि या काळानंतर कुठेही सत्तेचा अतिरेक झाला तर जनतेला ते आवडत नाही हे दिसून आले.

 

त्यानंतरच्या २५ वर्षांमध्ये जागतिकीकरण, माध्यमांचे जागतिकीकरण आणि चरितार्थासाठी नागरिकांची शहराकडे धाव आणि पर्यायाने नागरी विकासाकडे वाटचाल यासोबत, तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती मध्ये विकास, शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती या २५ वर्षांमध्ये आपण पाहिली. तसेच, गेल्या २५ वर्षांमध्ये आपण शाश्वत विकास उद्दिष्ट, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, लाडकी बहीण योजनेसारखी लाडकी लेक योजना अशा विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना आपण अंगिकरल्या. विशेषता २००० सालानंतर भारताच्या जनगणनेमध्ये झालेल्या वाढीच्या अनुषंगाने भारताच्या संपूर्ण आर्थिक नियोजनाचीसुद्धा सुरुवात झाली. पुढच्या काळामध्ये भारताचे ध्येय धोरण काय असेल आणि त्यानुसार भारत कसा असेल या बाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारपूर्वक पावले उचलून देशाच्या नवनिर्माणाचे कार्य हाती घेतले आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित दादा पवार यांनी देखिल इतर कार्यासोबतच महिलांच्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यामधून महिलांमध्ये अभूतपूर्व जागृती तयार झालेली आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समाज एकत्रितपणे स्त्रियांबरोबर त्यांच्या अधिकारासाठी उभा रहावा अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करते आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here