पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्याला देखील यश
विधिमंडळाच्या विनंती अर्ज समितीच्या बैठकीची शासनाने घेतली तात्काळ दखल-डॉ.गोऱ्हे
मुंबई,
आज विधानभवनामध्ये राजापूर नगरपालिकेच्या मालकीचे *कोदवली सायबाचे धरण* जिल्हा रत्नागिरी येथील नवीन धरणाचे काम पूर्ण होण्यासंदर्भात *विधान परिषद उपसभापती तथा विनंती अर्ज समिती प्रमुख डॉ.नीलम गोऱ्हे* यांनी विनंती अर्ज समितीची बैठक आयोजित केली होती. यामध्ये काही विधान परिषद सदस्यांचा अर्ज विनंतीअर्ज समिती समोर विचारार्थ आला होता.
या संदर्भात ०९ जुलै २०२४ रोजी बैठक विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती.आज त्याच अनुंषगाने आजच्या विनंती अर्ज समितीच्या बैठकीत या धरणाचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ८ कोटी १८ लक्ष रुपये मंजूर केले. त्याचा शासन निर्णय नगर विकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी समितीला सादर केला. यामुळे यावेळी बैठकीत उपस्थित असलेले *माजी विधान परिषद सदस्य हुस्नबानु खलीफे व विधान परिषद सदस्य राजेश राठोड* यांनी व राजापूर येथील ग्रामस्थ सुर्वे,ठाकूर,इसाब खतीब यांनी *उपसभापती नीलमताई गोऱ्हे* यांचे आभार मानले. याबाबत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यासाठी देखील पाठपुरावा केला होता.
गेले कित्येक वर्ष रखडलेले काम फक्त विधिमंडळाच्या विनंती अर्ज समितीमुळे मार्गे लागल्याची व दहा हजार नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याची आनंदाची भावना सदस्यांनी व्यक्त केली.
या बैठकीस राजेश राठोड विधान परिषद सदस्य, हुस्नबानो खलिफे, शासनाचे उपसचिव श्रीकांत आंडगे, विधिमंडळाचे सचिव आठवले, चेतन विसपुते मुख्यअधिकारी राजापूर नगरपरिषद व विधिमंडळाचे इतर अधिकारी उपस्थित होते.























