Home मुंबई ठरवलं तर कोर्ट एवढं त्वरेने हलू शकतं, हे समजलं. त्यासाठी कोर्टाचे अभिनंदन-...

ठरवलं तर कोर्ट एवढं त्वरेने हलू शकतं, हे समजलं. त्यासाठी कोर्टाचे अभिनंदन- उद्धव ठाकरे

127
0

शिवसेनेच्या वतीने शिवसेना भवन येथे तोंडाला काळा मास आणि काळी फिती लावून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद कोर्टाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आला असला, तरी राज्यभरात निषेध आंदोलन सुरु आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील सेना भवन परिसरात तोंडाला काळा मास्क, तर दंडावर काळी फित बांधून निषेध व्यक्त केला. उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे,  माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊतही उपस्थित होते.

मला या सरकारची कीव येते. नराधमांच्या विरोधात उभं राहण्याऐवजी ते त्यांच्यावर पांघरुण घालण्याचं काम करत आहे, पाठीशी घालत आहेत. नराधमांच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी होती. पण ज्या ज्या वेळी सर्व दरवाजे बंद होतात. त्यावेळी जनतेला रस्त्यावर उतण्याखेरीज पर्याय नसतो. आज खरं तर महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली. त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी आपले चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि अडथळे निर्माण केले. कोर्टाचेही आभार.. आम्हाला समजलं की आमच्या खटल्यासाठी दोन वर्ष तारीख पे तारीख सुरु आहे. पण ठरवलं तर कोर्ट एवढं त्वरेने हलू शकतं, हे समजलं. त्यासाठी कोर्टाचे अभिनंदन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येक घरात अत्याचार आणि मिंधे सरकार विरोधात मशाल धगधगत आहे. गेल्या आठवड्यात भारत बंद काही राज्यात पुकारला. त्यावेळी रेल्वे बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते. बंदला विरोध करणारे याचिकाकर्तेही तितकेच विकृत आहेत. राज्यकर्त्यांचे ‘सदा’ आवडते लोक आहेत हे, तुम्हाला शोभा देत नाही. यात राजकारण आणताय. महिला जाब विचारत आहेत, का आमच्या सुरक्षेच्या आड येताय? पण हे आंदोलन थांबता कामा नये. बस डेपो, रिक्षा स्टँड, चौकात स्वाक्षरी मोहीम घ्या. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. इथे बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत. इतकं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, यावेळी ‘फाशी द्या, नराधमाला फाशी द्या’, ‘नको आम्हाला पंधराशे, महिलांना सुरक्षा द्या’, ‘शक्ती कायदा झालाच पाहिजे’, ‘चिमुरडीला न्याय द्या, नाहीतर खुर्ची रिकामी करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. सर्व वयोगटातील महिला या आंदोलनात सहभागी होत सरकारविषयी रोष व्यक्त करत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here