पंढरपूर:(२५ जुलै) आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वावर आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा या पवित्र महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. प्रभावती बाबासाहेब माने आणि बाबासाहेब माधव माने (वय ७०) यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठल-रखुमाईच्या चरणी भक्तिभावाने पूजा अर्पण केली.
विठ्ठलाच्या कृपेने लाभलेला हा मान त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. या आनंददायी सोहळ्याला आणखी एक भावनिक स्पर्श देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या जपलेल्या परंपरेनुसार या मानकरी दाम्पत्याला एक वर्षासाठी एसटीच्या मोफत प्रवासाचा पास प्रदान केला.
ही केवळ प्रवासाची सुविधा नाही, तर वारकरी परंपरेचा, भक्तीचा आणि समाजातील आदर्श श्रद्धेचा केलेला सन्मान आहे. विठुरायाच्या सेवेत अखंड कार्यरत असलेल्या लालपरीने पुन्हा एकदा भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे.
महापूजेचा मान लाभलेल्या प्रभावती बाबासाहेब माने आणि बाबासाहेब माधव माने यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! विठुरायाची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव *विठुरायाच्या महापूजेचा मान…* *एसटीच्या सन्मानाची प्रेमळ परंपरा कायम!*




















