Home मुंबई *नाशिक रिंगरोडच्या बदललेल्या ‘अलाईनमेंट’ची तीन दिवसांत चौकशी*

*नाशिक रिंगरोडच्या बदललेल्या ‘अलाईनमेंट’ची तीन दिवसांत चौकशी*

30
0

*• बळजबरीने भूसंपादन नाही: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

*’त्या’ आयएएस अधिकाऱ्यांचा दोष नाही*

मुंबई, दि. ९ : नाशिक येथील कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची (अलाइनमेंट) पुढील तीन दिवसांत चौकशी करण्यात येईल, तसेच रिंग रोडमध्ये ज्यांनी जमिनी घेतल्या त्या प्रकरणाची चौकशी १५ दिवसांत केली जाईल,
अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.
रिंगरोडच्या कामात कोणत्याही शेतकऱ्यावर बळजबरी केली जाणार नाही, तसेच त्यांना कायद्यानुसार योग्य आणि समाधानकारक मोबदला दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

विधानसभेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी नाशिक रिंगरोडच्या अलाईनमेंटमध्ये जाणीवपूर्वक, उद्दिष्ट ठेवून बदल करण्यात आल्याचा आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनींचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप लक्ष्यवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. यामध्ये आमदार सरोज अहिरे यांनी प्रश्न उपस्थित केले. आक्षेप घेतले. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते.

*तीन वर्षांतील जमीन खरेदीची होणार चौकशी*
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, रिंगरोडची अलाईनमेंट नेमकी का बदलली गेली. उद्दिष्ट ठेवून जाणीवपूर्वक बदलल्या गेली का याची चौकशी तीन दिवसांत केली जाईल. रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या तीन वर्षांत या भागात कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का, याचा शोध घेतला जाईल. जर ही अलाईनमेंट जाणीवपूर्वक बदलली गेली असेल, तर त्याची अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी केली जाईल, असे सांगितले.
मात्र, भूसंपादनाच्या मोजणी दरम्यान हेल्मेट घालून गेलेले आयएएस अधिकारी दत्ता यांच्याबाबत सांगताना महसूल मंत्री म्हणाले, त्या दिवशी मोजणीदरम्यान काही आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, रॉकेलच्या बाटल्या आणल्या गेल्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दगडफेक किंवा रॉकेल हल्ल्यापासून स्वतःच्या बचावासाठी आणि सुरक्षेसाठी त्यांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे या अधिकाऱ्याचा कोणताही दोष नाही,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

*शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच काम*
कुंभमेळ्यासाठी हा रिंगरोड अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत महसूलमंत्री म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू. भूसंपादन अधिनियमानुसार त्यांना योग्य मोबदला दिला जाईल. सरकारकडून अतिरिक्त मदतीची अपेक्षा असल्यास त्यावरही सकारात्मक विचार केला जाईल, मात्र कुठेही बळजबरी होणार नाही.”
या चर्चेदरम्यान संबंधित मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनीही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले होते. त्यांनी या विषयाला सभागृहात वाचा फोडल्याबद्दल त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले.
—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here