*मुंबई l बुधवार दिनांक २४ जून २०२६*
मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एक अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना अत्यंत गंभीर असून ही घटना मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पर्दाफाश करणारी आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.
ॲड. मातेले म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, मॅनहोल सुरक्षा आणि पूरनियंत्रणासाठी कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात अधिकारीच मॅनहोलमध्ये पडत असतील, तर मुंबईकरांची सुरक्षा कोणाच्या भरवशावर आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मातेले यांनी केलेले प्रमुख आरोप नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय आहे.कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनमतातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचे चित्र दिसत आहे.कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जात असताना मुंबईतील सखल भागांमध्ये दरवर्षी पाणी तुंबते, यावरून कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उघडे मॅनहोल, खराब रस्ते आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साक्ष देत आहेत.मुंबईकरांचे जीव धोक्यात घालून काही मंडळी टक्केवारीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा संशय बळावत आहे.
यावेळी उपरोधिक टोला लगावत मातेले म्हणाले की, “वर्षानुवर्षे मुंबईकर मॅनहोल, खड्डे आणि पाण्यात पडत होते तेव्हा प्रशासनाला जाग आली नाही; पण आज अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यावर मात्र संपूर्ण व्यवस्था हादरली आहे. म्हणजे सामान्य नागरिकांच्या जीवाची किंमत वेगळी आणि अधिकाऱ्यांच्या जीवाची किंमत वेगळी का?”
मुंबईकरांच्या कररूपी पैशांचा नेमका वापर कुठे झाला, नालेसफाईच्या कामांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे, संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.
*– ॲड. अमोल मातेले*
*प्रदेशप्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार*


















