मुंबई
मुंबईच्या दिंडोशी परिसरात मरियम्मा देवीच्या यात्रेवर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता प्रशासनाने आपला मोर्चा त्यांच्या बेकायदेशीर साम्राज्याकडे वळवला आहे. संतोष नगर भागात झालेल्या हिंसक हाणामारीतील मुख्य आरोपींच्या अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने थेट बुलडोझर फिरवला आहे.
*काय घडले होते?*
मालाड पुर्व येथील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संतोष नगरमध्ये ५ एप्रिल रोजी रात्री देवी मरियम्माची पूजा आणि त्रिशूल यात्रा सुरू होती. यावेळी लाउडस्पीकरवर भजन वाजवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि त्याचे रूपांतर दंगलीत झाले.
या हिंसाचारात सहभागी असलेल्या सोहेल शेख आणि शब्बू शेख यांच्यासह इतर आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आधीच आवळल्या आहेत. आता या गुन्हेगारांनी उभी केलेली अनधिकृत बांधकामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तोडण्यात येत आहेत.
अंमली पदार्थांच्या विक्रीतून उभे केले होते साम्राज्य
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी शबाना हिने अमली पदार्थांच्या तस्करीतून बेकायदेशीरपणे मोठी मालमत्ता उभी केली होती. या परिसरात यापुर्वी झालेल्या पोलीस झडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले होते.
स्थानिक नागरिकांनी आणि काही सामाजिक संघटनांनी या अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रारी केल्या होत्या. गुन्हेगारी कृत्यांतून कमावलेल्या पैशातून हे साम्राज्य उभे राहिल्याचे समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने या अनधिकृत घरांवर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला.
या कारवाईदरम्यान पुन्हा एकदा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी दिंडोशी पोलिसांनी संपूर्ण संतोष नगर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. आतापर्यंत या दंगल प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






















